

Achalpur irrigation model
esakal
आम्ही जेव्हा निवडक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सहकारी मित्रांसह पश्चिम महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये अभ्यास दौऱ्यावर गेलो, तेव्हा आमच्या डोळ्यासमोर ग्रामीण विकासाचं एक जिवंत चित्र उभं राहिलं. तिथे शेती ही फक्त उपजीविकेचं साधन नव्हती, तर ती एक सक्षम अर्थव्यवस्था बनली होती. बारमाही सिंचनाची खात्री असल्यामुळे शेतकरी एका पिकावर मर्यादित राहिला नव्हता. फळबागा, भाजीपाला, नगदी पिके, दुग्धव्यवसाय आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग या सगळ्यांनी एक साखळी निर्माण केली होती. उत्पादन वाढलं, त्यावर प्रक्रिया झाली, त्यातून बाजारपेठ तयार झाली आणि त्यातून शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले. महिलांना रोजगार मिळाला, तरुण गावातच स्थिर झाले आणि गावाची अर्थव्यवस्था सक्षम झाली. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं की सिंचनामुळे शेतीला स्थैर्य येतं आणि स्थैर्यामुळे नियोजन शक्य होतं. नियोजनामुळे उत्पादन वाढतं आणि उत्पादनामुळे उत्पन्न वाढतं. ही एक साखळी आहे आणि त्या साखळीचा केंद्रबिंदू एकच आहे-बारमाही सिंचन. म्हणूनच आम्ही ठाम निष्कर्ष काढला की अचलपूरचा विकास करायचा असेल, तर बारमाही सिंचन हीच पहिली अट आहे.
अचलपूर मतदारसंघात चित्र वेगळंच होतं. देऊरवाडा, खांबोरा, शिरजगाव कसबा, बेलोरा, बेसखेडा, बोराळा, चिंचोली, वाठोंडा, ब्राह्मणवाडा थडी या गावांमध्ये आम्ही फिरलो तेव्हा एकच वास्तव समोर आलं - शेतकरी मेहनती होता; पण बारमाही सिंचनाची उपलब्धता नव्हती. काही ठिकाणी ओलीत होती; पण ती हंगामी आणि अपुरी होती. पावसावर आधारित शेतीमुळे उत्पादन पूर्णपणे अनिश्चित होतं. एक वर्ष चांगलं गेलं तर शेतकरी सावरायचा; पण पुढच्या वर्षी पुन्हा संकट यायचं. भूगर्भातील पाण्याची पातळी सतत खाली जात होती. विहिरी खोल होत होत्या; पण त्यातून उपयोग होत नव्हता. त्यामुळे शेतकरी कितीही मेहनत करीत असला तरी त्याच्या आयुष्यात स्थैर्य येत नव्हतं. या परिस्थितीने आम्हाला स्पष्ट दाखवलं - प्रश्न शेतीचा नाही, तर बारमाही सिंचनाच्या अभावाचा आहे.
शेतकरी मेहनत करतो, पेरतो, खत टाकतो, कर्ज काढतो; पण सिंचनाची खात्री नसल्यामुळे त्याचं पीक टिकत नाही. देऊरवाडा आणि खांबोरा येथे आम्ही अशी शेतं पाहिली जिथे पेरलेलं बी उगवलंच नाही. शिरजगाव कसबा आणि बेलोरा येथे उभं पीक उन्हात करपलेलं दिसलं. बेसखेडा आणि बोराळा येथे विहिरी कोरड्या पडलेल्या दिसल्या. चिंचोली आणि वाठोंडा येथे जनावरांसाठीही चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. शेतकरी रोज मेहनत करत होता; पण त्याच्या मेहनतीला कोणताही स्थिर आधार नव्हता. त्याच्या डोळ्यांत अपेक्षा होती; पण हातात काहीच नव्हतं. त्यामुळे आम्ही स्पष्ट सांगतो - शेतकरी अपयशी नाही, तो बारमाही सिंचनाच्या अभावामुळे अडलेला आहे.