

Rural Healthcare Support
esakal
रात्रीची विदर्भ एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने धावत होती. डब्यात कुणालाच झोप लागत नव्हती. कुणाच्या हातात तपासण्याच्या फायली होत्या, कुणी वेदनेने कण्हत होतं; तर कुणाच्या घरच्यांच्या डोळ्यात अश्रू होते. एखाद्याला कर्करोग, कोणाला हृदयाचा आजार, कुणाची किडनी निकामी; तर कुणाला ब्रेन ट्युमर... त्या सगळ्या चेहऱ्यांवर एकच सवाल होता, ‘भाऊ, आम्ही इतक्या लांब आलोय... आता उपचार होतील ना?’ त्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नव्हतं. कारण जीव देणारा देव आहे; पण एक गोष्ट आम्ही मनाशी पक्की केली होती, की गरीब माणूस पैशाअभावी उपचाराशिवाय परत जाणार नाही. त्यासाठी कितीही धावपळ करावी लागली, कितीही संघर्ष करावा लागला, तरी मागे फिरायचं नाही. आज लोक आम्हाला आंदोलनामुळे ओळखतात; पण आमच्या आयुष्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं आंदोलन हे रुग्णाला जगवण्याचं होतं.
कॉलेजमध्ये असतानाच समाजकारणाची आवड लागली. माझे सहकारी, मित्र आणि कार्यकर्ते मिळून लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करायचो. कुणाला रक्त हवं असेल, कुणाला दवाखान्यात न्यायचं असेल, कुणाकडे औषधासाठी पैसे नसतील; तर आम्ही पुढे असायचो. तेव्हा ना सत्ता होती, ना पद होतं, ना प्रसिद्धीची अपेक्षा... १९९३ मध्ये मी ठरवलं, की विदर्भ, मेळघाट आणि ग्रामीण भागातील गंभीर आजार असलेल्या गरीब रुग्णांना उपचारासाठी मोठ्या दवाखान्यात घेऊन जायचं. त्या काळात कर्करोग, हृदयरोग, किडनी, लिव्हर, ब्रेन ट्युमर, स्पाईन किंवा मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मुंबईशिवाय दुसरा पर्याय नव्हता; पण गरीब माणसासाठी उपचारापेक्षा मोठी भीती होती ती खर्चाची. घरातली शेती विकायची का, दागिने गहाण ठेवायचे का, कर्ज काढायचं का, असे प्रश्न प्रत्येक घरात असायचे. अशा वेळी आम्ही त्यांना एकच शब्द द्यायचो, ‘तुम्ही धीर सोडू नका. बाकीची काळजी आम्ही आणि आमचे सहकारी घेऊ.’ त्या एका वाक्यावर अनेक कुटुंबांनी जगण्याची आशा धरली.