पुणे : ‘जेवढा वापर, तेवढेच बील’ या दिशेने आता सर्वच गोष्टींची वाटचाल सुरू झाली आहे. अनावश्यक खर्च टाळण्यासाठीचा एक चांगला पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. जसे तुमच्याकडे प्री- प्रेड मोबाईल आहे. दर महिन्याला तुम्ही पैसे भरून रिचार्ज करता. जेवढे पैसे असेल, तेवढ्याच रिचार्ज करता.. आता अशा प्रकारे महावितरण देखील नागरीकांसाठी ही सुविधा आणू पाहत आहे. जेवढी वीज तुम्ही वापराला, तेवढेच वीजबिल भरा अथवा जेवढे पैसे तुम्ही भरले, तेवढीच वीज तुम्हाला उपलब्ध होईल. तुम्ही बाहेर गावी जाणार असाल, तर मीटर पूर्ण बंद राहिल. त्या काळातील तुम्हाला वीजबिल येणार नाही. एखाद्या महिन्यात तुमची आर्थिक अडचण आहे, तेव्हा तुम्ही वेगवेळ्या मार्गाने बचत करता. त्यामध्ये आता विजबीलाचा पर्यायाचा देखील समावेश करता येऊ शकतो.
वाढती थकबाकी, नादुरूस्त वीज मिटर, रिंडींगवरून निर्माण होणारा गोंधळ अशा अनेक तक्रारींचा सामाना नागरीकांना करावा लागतो. एवढेच नव्हे, तर नवीन वीजजोड घेण्यासाठी देखील किती त्रास सहन करावा लागतो, यांचा अनुभव प्रत्येकाला एकादा तरी आयुष्यात घ्यावा लागतो. असा अनुभव घेतलेल्यांची संख्या देखील मोठी आहे. याचा त्रास जसा तुम्हाला होतो. तसा काही प्रमाणात महावितरणला देखील सहन करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीचा मोठा फटका महावितरणाला बसला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचे दर देखील जास्त आहेत. वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर उभा राहल्यामुळे महावितरण देखील आर्थिक चणचण जाणू लागली आहे. वीजनिर्मिती, वितरण आणि वसुली या गोष्टींसाठीचा महावितरणाला मोठा खर्च येतो. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मात्र घटत चालले आहे. त्यातच विजचोरी ही देखील महावितरणाची डोकेदुखी ठरत चालली आहे. या सर्व गोष्टींवर पर्याय म्हणून महावितरणने देखील आता घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर (प्री-पेड) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यासह मुंबई, नागपूर, औरंगाबाद यासारख्या मेट्रो सिटींमध्ये प्राथमिक स्तरावर हे स्मार्ट मिटर महावितरणकडून लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढे पैसे भरणार, तेवढीच वीज वापरता येणार. नको असेल, तेव्हा मीटर रिचार्ज करणे थांबविता येणार आहे.