कोरोना काळात अनेकांच्या जोडीदारांचे निधन झाल्यामुळे घराची, गुंतवणुकीची घडीच विस्कटून गेली. निधनानंतर अशा प्रकारे गुंता होऊ नये यासाठी काय करणे गरजेचे आहे, मृत्युपत्रापासून खाते ‘आयदर ऑर सर्व्हायवर’ करण्यापर्यंत कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यांचे नियम कोणते आदी गोष्टींबाबत ऊहापोह.
कोरोना काळात जीवनाची अनिश्चितता आपल्याला उमगली आहे. आपल्या प्रत्येकाच्या ओळखीतले अनेक जण कोरोनाला बळी पडले आहेत. आपण गुंतवणूक करतो ती आपला पैसा सुरक्षित राहावा आणि त्यावर चांगला परतावा मिळावा म्हणून, त्या गुंतवणुकीचा उपभोग घेता यावा म्हणून. मात्र, ज्यांनी गुंतवणुकीची नीट सोय करून ठेवली नव्हती आणि अचानक (कोरोनाला) बळी पडले, त्यांच्या घराची, व्यवसायाची; तसेच गुंतवणुकीची पूर्ण घडीच या धक्क्याने विस्कटून गेल्याचे दिसून आले.
जीवनाबाबत अनिश्चितता कळल्यामुळे की काय, पण कोरोना काळात वकील मंडळींकडे मृत्युपत्राबाबत विचारणा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, या बाबतीत काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात आल्या त्या म्हणजे जोडीदारांना किंवा घरातल्या जवळच्या सदस्यांना एकमेकांच्या प्रॉपर्टी, बँक खाती, पॉलिसी, शेअर्स, ऑनलाईन बँकिंग करत असल्यास त्याचे पासवर्ड, ते कसे वापरायचे यांच्याबद्दल काहीच माहिती नसते.