पर्यावरणाकडे होते आहे दुर्लक्ष
पर्यावरणाकडे होते आहे दुर्लक्ष- Esakal

तापमानवाढीकडे दुर्लक्ष ठरेल जीवघेणे....

जागतिक तापमान वाढ ही जगासमोरील सर्वांत मोठी समस्या असताना त्याकडे राजकीय सोयीसाठी आणि स्वत:च्या फायद्यासाठी सर्वच देश दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या विषयाचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी वाचा.....

र्यावरणाची समस्या गंभीर होत असल्याने गेल्या वर्षी कोरोना कालावधी असतानाही स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे पर्यावरण परिषद झाली. या परिषदेमध्ये सहभागी सर्वच देशांनी कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याची तयारी दर्शविली. कोळशाचा वापर पूर्णपणे बंद करण्यास नकार देत भारताने ऐनवेळी मसुद्यात बदल करण्यास भाग पाडले. कोळशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने कोळशाचा वापर तातडीने थांबवता येणार नाही, असे भारताने स्पष्ट केले होते. (Rising Global Temperature can prove fatal in coming time)

ही परिषद झाल्यानंतर एक वर्ष सर्व जग कोरोनाशी (Corona) लढण्यात अडकून पडले होते. त्यातून बाहेर येत नाही, तोच रशियाने युक्रेनवर आक्रमण (Russia-Ukrain War) केले आणि पर्यावरणाचा मुद्दा पुन्हा एकदा मागे पडला आहे. वास्तविक, जागतिक तापमान वाढ ही जगासमोरील सर्वांत मोठी समस्या असताना त्याकडे राजकीय सोयीसाठी आणि स्वत:च्या फायद्यासाठी सर्वच देश दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भारतात सध्या कोळशाच्या (Coal) कमतरतेमुळे ऊर्जा संकट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही देश इतर देशांमधून कोळसा आयात करण्यासाठी करार करण्याचा विचार करत आहे. यामुळे, तापमान वाढ आणि ऊर्जा संकट हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोळसा खाणींना परवानगी देण्यावरूनही पर्यावरण प्रेमींचा लढा सुरु आहे. वाढत्या खाणींमुळे तापमानवाढीत भर पडत असल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

त्यामुळे तापमानवाढीमुळे होणाऱ्या परिणामांवर पुन्हा एकदा सविस्तर चर्चा करणे भाग आहे. हा मुद्दा एकदा चर्चा करून थांबण्यासारखा नाही. वारंवार लोकांसमोर पर्यावरणाची समस्या मांडून त्याचे गांभीर्य लोकांना लक्षात आणून देणे, सर्व पर्यावरण प्रेमींचे कर्तव्यच आहे.

तापमानातील वाढ हे पर्यावरण (Environment) बदलाचे मूळ आहे आणि या तापमान वाढीला मानव कारणीभूत आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पर्यावरण बदलाच्या एकूण घटनांपैकी 69 टक्के घटना मानवी हस्तक्षेपामुळे घडल्या आहेत. पर्यावरणातील तीव्र बदलांपैकी 47 टक्के घटना या उष्णतेच्या लाटा तर, 15 टक्के घटना पाऊस आणि पुराच्या आहेत. कोळसा आणि इतर नैसर्गिक इंधनांचा वीजनिर्मिती, विविध उपकरणे, वाहतूक अशा कारणांसाठी वापर वाढल्याने त्यातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते.

तापमानवाढीचा पुढील घटकांवर मुख्यत: परिणाम होतो-

१. जैवविविधता : जैवविविधता हा जागतिक पर्यावरण यंत्रणेचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या जैवविविधतेमुळेच पर्यावरण वैशिष्ट्यपूर्ण होते, त्याची वाढ होते आणि विकास होतो. अवाढव्य हत्तीपासून ते डोळ्यांनाही न दिसणाऱ्या जीवाणूपर्यंत सर्व घटक या जैवविविधतेचा हिस्सा आहेत. या यंत्रणेला हानी पोहोचली तर त्याचे परिणाम दूरगामी ठरतात. त्यामुळे आपल्या सर्वांच्याच जगण्यासाठी ती टिकून राहणे अत्यंत आवश्‍यक आहे. तापमानवाढ, प्रदूषण, जंगलतोड या कारणांमुळे ही जैवविविधता नष्ट होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास इतक्या वेगाने होत आहे की, त्यामुळे अब्जावधी प्रजाती नष्ट होत आहेत. यामुळे जैव साखळ्या नष्ट होत आहेत.

२. पाणी : पाण्यामधील जीवन हे वेगळे विश्‍व आहे. वाढत्या प्रदूषणामुळे हे विश्‍व धोक्यात येत आहे. कारखान्यातून अनिर्बंधपणे नद्यांत सोडले जाणारे विषारी पाणी, कोणतेही नियोजन नसलेले नद्यांवरील प्रकल्प, वाळू उपसा या सर्वांमुळे जगण्याचा आधार असलेला हा स्रोत धोक्यात आला आहे. पाणी प्रदूषित झाल्याने त्यावर प्रक्रिया करण्याचा खर्चही वाढतो आहे. पण त्याहूनही भयानक म्हणजे त्यामुळे पाण्यामधील जीवन आणि मानवी जीवन धोक्यात आले आहे. जनजागृती हाच त्यावर एकमेव उपाय आहे. शाळास्तरापासूनच मुलांना या प्रदूषणाबाबत जाणीव करून देणे आवश्‍यक आहे. तरच, त्याचा त्यांच्यावर संस्कार होईल आणि ही पिढी तरी पर्यावरणाकडे जागरूकतेने पाहिल.

३. जंगलतोड : एकूण जमिनीच्या किमान २१ टक्के क्षेत्र हे जंगलांखाली असावे, तरच पर्यावरण टिकून राहण्यास मदत होईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, जगभरात सर्वत्रच बेबंदपणे जंगलतोड होत आहे. दोनच वर्षापूर्वी जगातील सर्वांत मोठे सदाहरित वनांचे जंगल असलेल्या ॲमेझॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचे उघड झाले होते. याच जंगलाला वणव्यांचाही मोठा फटका बसला होता. हजारो हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले होते. या आगीमुळे अनेक दुर्मिळ झाडांबरोबरच लाखो जीवही भस्मसात झाले. अशाच आगी कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इतर अनेक देशांमध्ये लागल्या. असे वणवे हा देखील तापमानवाढीचाच परिणाम आहे. जंगले कमी झाल्याने हवेच्या दर्जावरही त्याचा परिणाम होत आहे.

अन्नसुरक्षेचा प्रश्‍न

आगामी काळात अन्नसुरक्षेची समस्या अत्यंत गंभीर असेल, असे जगभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पर्यावरण बदलामुळे निसर्गाचे चक्र बिघडले आहे. त्याचा शेतीवर परिणाम होत असल्याने काही देशांमध्ये अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड कमी झाले आहे. त्यामुळे या समस्येकडे आताच लक्ष दिले नाही, तर जगात अन्न आणि पाण्यावरून युद्ध होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

पाऊस-पूर

गेल्या काही महिन्यांमध्ये चीन, जपान, भारत, अमेरिका, व्हिएतनाम, ब्रिटन या देशांमध्ये पुराने थैमान घातले. चीनमधील अनेक शहरे पाण्याखाली असल्याची आजची स्थिती आहे. या सर्वच ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक असाच पाऊस झाला आहे.

चक्रीवादळ

समुद्रात चक्रीवादळ येण्याचे आणि त्यांची तीव्रता अधिक असण्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेला गेल्या वर्षी धडकलेले लॉरा वादळ, 2017 मधील मारिया आणि 2005 मधील कॅटरिना वादळे आठवत असतील. भारतालाही बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या वादळांचा तडाखा बसतोच, पण यंदा 1902 नंतर प्रथमच अरबी समुद्रात चार वादळे निर्माण झाली होती. हा सागरावरील तापमान वाढीचा परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

जागतिक तापमानात वाढ झाल्याने ध्रुवांवरील बर्फ वितळून समुद्राची पातळी उंचावत आहे. अंटार्क्टिका खंडापासून तुटून महाप्रचंड हिमनग वेगळे होत आहेत. गेल्या दीडशे वर्षांत समुद्राची पातळी आठ इंचाने वाढली आहे. ही केवळ ठळकपणे दिसणारी आणि अद्यापही आपल्या स्मरणात असलेली उदाहरणे आहेत. वातावरण बदलाची व्याप्ती आणि परिणाम याहून अधिक आहेत. हा बदल रोखायचा अथवा त्याचा वेग कमी करायचा असेल तर मूळ समस्येवर तोडगा काढायला हवा. तापमान वाढ ही ती समस्या आहे. याच वाढत चाललेल्या तापमानाला आळा घालण्याचा आटापिटा सुरू आहे.

सर्वसामान्य जनतेच्या अज्ञानाचा आणि दुर्लक्षाचा फायदा पर्यावरणाच्या बाबीतही घेतला गेला आहे. निसर्गाचे रूपांतर स्रोतात झाले आणि त्याला हव्यास, स्वार्थ आणि क्वचित गरज आणि परिस्थिती यांची जोड मिळाल्याने पर्यावरण नाशाला सुरुवात झाली. पर्यावरणाला पूरक ठरणारी जीवनशैली विसरली गेल्याने समोर असलेल्या संकटाची अद्यापही अनेकांना जाणीव नाही. तरीही अनेक पर्यावरणप्रेमी एकट्याने किंवा संघटना करून लढा देत आहेत.

मात्र त्यांना मार्गातून दूर करण्याचे प्रयत्न होत आहेत. या पर्यावरण रक्षकांमध्ये शेतकरी, आदिवासी, मच्छीमार असे निसर्गावर अवलंबून असणारे घटक आणि सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचा समावेश आहे. पर्यावरण संरक्षणात यांची भूमिका मोठी असल्याचे संयुक्त राष्ट्रांनीही मान्य केले आहे. त्यांच्या चळवळींमुळेच 11 टक्के ठिकाणी संभाव्य ऱ्हास रोखला गेला आहे.

समाजामध्ये पर्यावरणाबाबत जागृती येऊन त्यांच्या सवयी बदलल्यास, समाजाचा सरकारवर दबाव वाढून उपाययोजना झाल्यास आशेचे किरण दिसू शकतात. बदलणाऱ्या वातावरणाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला हवा, तो अभ्यास जनतेसमोर यायला हवा.

पूर वाढण्याचा अंदाज

आगामी काळात पूर येण्याचे आणि त्यांची तीव्रता वाढणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. पुढील काही दशकांत पुराचा फटका जगातील 1.2 टक्के लोकांना बसेल, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे. पुरामुळे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसतो. शेतीचे नुकसान होते. आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. पुरामुळे मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होत असल्याने विकासाची दरी रुंदावत जाते. समाज काही वर्षे मागे ढकलला जातो.

काय करता येईल?

तापमान वाढीचा वेग कमी करणे हा अवघड पण आवश्यक उपाय आहे. त्यासाठी स्वच्छ ऊर्जेचा आग्रह धरायला हवा. सौर, पवन ऊर्जेचा वापर वाढल्यास त्यात नवनवीन शोध लागून त्याचा वापर करणे सोयीचे जाईल. जीवनशैलीत बदल ही प्रत्येकाने अमलात आणण्याची बाब आहे. कोणतीही कृती करताना पर्यावरणाचा विचार व्हायला हवा. पर्यावरण संरक्षण हा आपला स्वार्थ आहे, असे समजून काम होणे आवश्यक आहे. पर्यावरण बदल हा काही चर्चेसाठीचा नवीन विषय नाही. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यावर सविस्तर चर्चा, वाद, करारमदार होतच असतात. पण हा केवळ चर्चेचा मुद्दा नसून आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला, जागतिक धोरणे ठरवण्याची ताकद असलेला विषय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com