गाव ते महानगर आणि उद्योगनगरी ते क्रीडानगरी पिंपरी-चिंचवडचा प्रवास
पिंपरी-चिंचवड महानगर. अवघ्या ३९ वर्षांच शहर. त्यापूर्वीची असलेली छोटी-छोटी खेडी आता उपनगरे झाली आहेत. त्यांच्यामुळे स्मार्ट शहराची निर्मिती झाली आहे. या स्मार्ट शहरात राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडत आहे. गावागावांचे बनलेली उद्योनगरी महानगर झाले. त्याची वाटचाल आता स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी बरोबरच क्रीडानगरीकडेही सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईच्या संघाकडून खेळलेल्या सांगवीतील ऋतुराज गायकवाडने पिंपरी-चिंचवडच्या लौकिकात, इतिहासात, वैभवशाली प्रवासात भर घातली आहे. पूर्वीचे गावागावांत असलेले पहेलवानांचे आखाडे, तालमी जीवंत ठेवत क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, हॉलिबॉल, फुटबॉल, सायकलींगसह अन्य मैदानी खेळांसाठी क्रीडांगणे उभारली आहेत. यासाठी महापालिकेसह खाजगी संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ‘पिंपरी-चिंचवडमधील आमची मुलेही होऊ शकतात खेळाडू,’ ‘पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत घडत आहेत राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय खेळाडू’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पिंपरी-चिंचवड शहर हे कौलारू घरे जाऊन उद्योगांचे नगर म्हणून नावारुपास आलेसे आहे. ही केवळ उद्योगनगरी नसून क्रांतिकार चापेकर यांची जन्मभूमी आहे. महासाधू मोरया गोसावी यांचे समाधीस्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारक घडविणाऱ्या राष्ट्रीय पाठशाळेचे गाव आहे. सुमारे दोन हजार वर्षापूर्वी होऊन गेलेल्या भोज राजाच्या राजधानीचे शहर आहे. ते म्हणजे भोजापूर. आताची भोसरी.