पुण्याचे पाणी का तापते ?
साधारणपणे डिसेंबर- जानेवारी सुरू झाला की पुणे शहरातील पाणी कपातीची चर्चा दरवर्षी सुरू होते.
हा मथळा वाचून तुम्हाला वाटेल की पुण्यात पाणी आपोआप गरम होते का ? तर तसे नाही. पुण्याचे पाणी का तापते म्हणजे, पुणे शहराला जलसंपदा विभागाच्या धरणांमधून केला जाणारा पाणी पुरवठा हा कायम का वादाचा मुद्दा राहिलेला आहे. यात राजकारणी एकमेकांवर टीका करतात, आरोप प्रत्यारोप करतात. कार्यकर्ते आंदोलन करतात. नागरिक या सर्वांना शिव्या घालतात. महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यातील पत्रयुद्ध हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे राज्यात कुठेही पाणी पुरवठ्यावरून, धरणातील पाणी साठ्यावरून वाद निर्माण होत नाहीत. ते निर्माण होतात केवळ पुण्यात. आता पाण्यावरून वाद घालण्याचा गुणधर्म येथील पाण्यात आहे की लोकांच्या स्वभावात असा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. पण तसे नाही, पुण्याच्या पाण्याचा वाद हा राजकीय आणि प्रशासकीय आहे. एखाद्या शहरासाठी वेळेवर निर्णय न घेतल्याने व पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेत वेळेवर सुधारणा न केल्याने कसा दूरगामी परिणाम होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुणे शहर आहे.