भारत आणि पाकिस्तानच्या १९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम आणि पूर्व या दोन्ही आघाड्यांवर युद्ध करावे लागले. या युद्धात तिन्ही दलांचा समर्पक उपयोग करण्यात आला. या युद्धातील विजयामुळे भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. आज भारताचे विविध देशांशी चांगले संबंध असले तरी पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारताच्या सुरक्षिततेला धोका पोचवत आहेत. (Pakistan and China trying to harm India's security)
चीनचे घुसखोरी धोरण
भारताच्या हॉटस्प्रिंग, डोग्रा, गलवान या भागात चीनने घुसखोरी केली होती. आता चीन भारताच्या तवंग सेक्टर, उत्तराखंड, पूर्व लडाख येथे अशांतता पसरविण्यासाठी विविध प्रकारच्या कारवाया करत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की चीन तुमचा शेजारी आहे. भारताचे इतर शेजारी देशांशी असलेले संबंध तोडण्यासाठी चीन पूर्ण जोर लावत आहे. यासाठी श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार या शेजारच्या देशांमध्ये आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी चीनने पावले उचलली आहेत. सीमेवर आपल्या सैन्याची ये-जा आणि त्यांना लागणाऱ्या सुविधा अत्यंत कमी वेळेत व सहजपणे पोचविण्यासाठी चीन सीमावर्ती भागातील गावांमध्ये विकास कामांवर भर देत आहे. चीनने आजपर्यंत कोणतेही मोठे युद्ध लढले नसले तरी घुसखोरी करणे हा चीनचे महत्त्वाची रणनीती असून त्याचप्रमाणे चीन आपली भूमिका पार पाडत आहे.