- अंजली काचळे
आज कुठे कुस्तीला चांगले दिवस येऊ लागले होते. गावोगावी लाख-दोन लाख बक्षिसांच्या कुस्त्या रंगत होत्या. पण या कोरोनाने एकजात सारेच पहिलवान चितपट करून टाकलेत. जत्रा नाहीत की यात्रा नाही. त्यामुळे दरवर्षी भरणारे मोठमोठे कुस्त्यांचे आखाडेही नाहीत. वर्षभर तालमीत घाम गाळून, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही महिना किमान २० ते २५ हजार रुपये खर्चून घडवलेली पिळदार शरीरे आजमावण्याची संधीही नाही. अशा विदारक परिस्थितीत सराव पुढे चालू ठेवण्यासाठी, खुरकासाठीचे हक्काचे उत्पन्न पूर्णपणे आटल्यामुळे पैलवानांना तालमी सोडून आपापल्या गावी परतावे लागले.