१५ वर्ष कचरा व्यवस्थापनाच्या संघर्षाची
एक काळ होता २००६-०७ च्या पूर्वीचा,पुणेकर घरात जमा आलेला ओला सुका कचरा घ्यायचे आहे,रस्त्यावर ठेवलेल्या कचऱ्याच्या कंटेनरमध्ये भिर्रभीर्र फेकून देत. ओसंडून वाहणाऱ्या या कंटेनरमुळे दुर्गंधी तर पसरायची. भटके कुत्रे,जनावरे याचे त्यावर राज्य असायचे. शहराच्या प्रत्येक भागात कोपऱ्या कोपऱ्यावर हे कंटेनर असायचे. महापालिकेची कंटेनर उचलणारी गाडी वेळेत आली नाही किंवा एखादा झाला झालाच तर पार वाट लागायची. पुणे हे राज्यातील सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर,आयटी हब अशी ओळख होताना विकासाची पावले वेगाने पुढे जात असताना कचरा हा भयानक प्रश्न निर्माण झाला होता. पण आता जवळपास १५ वर्षानंतर पुणे कंटेनरमुक्त,डंपिंग मुक्त आणि जवळपास ९५ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करणारे शहर झाले आहे. हा नेमका प्रवास कसा होता हे पाहूया.(Pune Garbage & Waste Management)
जागतिकीकरणाच्या पूर्वी पुणे आताच्या तुलनेत लहान होते. दैनंदिन कचरा तयार होण्याचे प्रमाणही ५०० टनापेक्षा कमी होते. पण जागतिकीकरणानंतर शहराचा झपाट्याने विकास सुरू झाला. कोथरूड सारखे उपनगर आशियातील सर्वाधिक वेगाने विकसित झालेला भाग आहे असे पुणेकर अभिमानाने सांगत. पण याच कोथरूडमधील कचरा डेपो या भागातील प्रचंड दुर्गंधीसाठी कारणीभूत ठरू लागला. राज्य सरकारने १९९१ ला पुण्याच्या कचरा डेपोसाठी उरुळी देवाची- फुरसुंगी येथे १४३ एकर जागा दिली. पुण्यापासून अंतर जास्त आणि कोथरूड डेपोचा वापर जास्त असल्याने तेथे खूप कमी कचरा डंपिंग केला जात होता. कोथरूडचा लौकिक वाढत असताना त्याला डाग नको म्हणून १९९९ मध्ये पुणे महापालिकेने हा डेपो बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून शहरातील कचरा उरुळी देवाचीला जाऊ लागला.