

RBI Integrated Ombudsman Scheme 2026
esakal
कौस्तुभ केळकर - kmkelkar@rediffmail.com
बँकिंग व्यवहार झपाट्याने डिजिटल होत असताना ग्राहकांच्या तक्रारींचे स्वरूपही अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना जलद, पारदर्शक आणि प्रभावी न्याय मिळावा, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एकात्मिक लोकपाल योजना-२०२६ लागू केली आहे. वाढीव नुकसानभरपाई, अधिक सुलभ तक्रार प्रक्रिया आणि कालबद्ध निवारण या वैशिष्ट्यांमुळे ही योजना बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
आजच्या काळात बँकिंग व्यवहारांची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ग्रामीण भागातही बँकिंग सेवांचा विस्तार झाला असून, बँक ग्राहकांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. देशातील संपूर्ण बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक बँका आणि विविध वित्तीय संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवते. तसेच ग्राहकांना योग्य सेवा मिळते आहे का, त्यांच्या हिताचे संरक्षण होते आहे का, यावरही लक्ष ठेवते. एखाद्या ग्राहकाच्या तक्रारीची दखल संबंधित बँक शाखा किंवा वरिष्ठ स्तरावर घेतली जात नसेल, तर तो रिझर्व्ह बँकेच्या लोकपालाकडे (Bank Ombudsman) दाद मागू शकतो.