

Samangad Fort History
esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1@gmail.com
गडदुर्ग हे सह्याद्रीचे वैभव आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे बलस्थान आहे. सह्याद्रीच्या दुर्गम आणि अजिंक्य गडदुर्गाच्या मदतीने शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी अनेक दुर्ग जिंकले. काही दुर्ग बांधले; तर अनेक दुर्गांचा जीर्णोद्धार केला. सह्याद्रीला लढायला शिकविणारा महापराक्रमी हिमालय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या संकल्पनेतून अनेक गडदुर्गांची निर्मिती झाली. अनेक दुर्ग त्यांनी जिंकले. याद्वारेच त्यांनी मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज आणि सिद्दीला जेरीस आणले. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा दुर्ग आहे, सामानगड!
सामानगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील चिंचेवाडी गावाजवळ आहे. हा दुर्ग सह्याद्रीच्या पूर्व दिशेला आहे. भुदरगड, रांगणा, पन्हाळा, विशाळगड इत्यादी गडांना रसद पुरविण्यासाठी अर्थात सामान पुरविण्यासाठी या गडाचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे या गडाला ‘सामानगड’ असे म्हणतात.
सामानगड हा प्राचीन दुर्ग आहे. शिलाहार राजा भोज दुसरा याने बाराव्या शतकात हा गड बांधला. अत्यंत आखीव-रेखीव, उत्तम विहिरी, वास्तू, मंदिराची रचना असणारा सामानगड हा खूपच प्रेक्षणीय आहे. अनेक शाह्यांनी या गडावरून राज्यकारभार पाहिला. गडदुर्गांचे महत्त्व ओळखून त्यांचा उपयोग प्रजेच्या कल्याणासाठी करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सामानगड १६६७ साली जिंकून घेतला. सुमारे पाचशे वर्षांच्या काळात सामानगडाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली होती. बुरूज ढासळले होते. तटबंदी कोसळल्या होत्या. प्रवेशद्वार जमीनदोस्त झाले होते. विहिरी बुजल्या होत्या. हा दुर्ग जिंकल्यानंतर शिवाजीराजांनी बुजलेल्या विहिरी जिवंत केल्या. बुरूज-तटबंदीचे मजबुतीकरण केले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला. प्रवेशद्वाराची दुरुस्ती केली. अनेक वास्तू बांधल्या. त्यांना अतिरिक्त दारूगोळा, धान्यसाठा, शिबंदी ठेवली. त्यांनी गडदुर्गांचे महत्त्व ओळखले होेते. भुदरगड, रांगणा, पन्हाळा, विशाळगड इत्यादी गडांना दारूगोळा, शस्त्रसाठा, धान्य आणि सैन्यपुरवठा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सामानगडाचा वापर केला. शिवकाळात सामानगड हा अत्यंत महत्त्वाच्या गडदुर्गांना रसद पुरवत होता.