

India T20 World Cup 2026 victory
esakal
२०२४च्या विश्वचषक संघात संजू सॅमसन होता. संघ व्यवस्थापनाचा रिषभ पंतवर जास्त विश्वास होता म्हणून सॅमसन फक्त संघाबाहेर बसून होता. त्याने त्या काळात खराब वाटून न घेता आपल्या खेळात सुधारणा करत प्रचंड सराव केला. २०२६च्या विश्वचषक संघात मुख्य यष्टीरक्षक म्हणून निवड झाल्यावर सॅमसनच्या फॉर्मला धक्का लागला. मुख्य स्पर्धेअगोदरच्या दोन देशांमधील सामन्यात त्याला फलंदाज म्हणून सातत्याने अपयश आले. संघातून तो बाहेर गेला. संघ व्यवस्थापनाला सॅमसनच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने बदललेल्या रणनीतीत सॅमसन परत संघात आला आणि त्याने बरोबर निर्णायक तीन सामन्यांत संघाला विजयाच्या मार्गावर नेणारी फलंदाजी करून दाखवली. अफलातून कामगिरी केलेला संजू सॅमसन स्पर्धेचा मानकरी ठरला. अपयशातून यशाचा मार्ग शोधताना संजू सॅमसन सतत सचिन तेंडुलकरच्या संपर्कात होता. सल्ला देण्यापेक्षा सचिनने संजू सॅमसनची खेळाकडे बघण्याची दृष्टी बदलली. त्याने सांगितलेले दोन महत्त्वाचे मुद्दे असे होते. संजूने जेव्हा सतत येणाऱ्या अपयशानंतर निराशेकडे मन ओढले जात असल्याचे सचिनला सांगितले, तेव्हा सचिन म्हणाला, जर मेहनत, सराव, आहार, व्यायाम, एकाग्रता सगळ्या बॉक्सेसना टीक करतो आहेस, तर खराब कामगिरी होताना उलट जास्त आशा वाटायला पाहिजे. कारण साधे आहे वाईटानंतर हमखास चांगले होते. यश तुझे अगदी कोपऱ्यावर वाट बघते आहे. फक्त तू चार पावले जास्त चालायची तयारी ठेव आणि दुसरा मुद्दा होता कामगिरीच्या दडपणाचा. सचिनने संजूला समजावले की, तुझा दृष्टिकोन जरा चुकतोय. तू संघातील जागा पक्की करायचा प्रयत्न करतो आहेस. मला वाटते तुझी क्षमता बघता तू भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कामगिरीचा विचार करायला पाहिजे. या एका विचाराने संजू सॅमसनचे मन उघडले. तो संघासाठी खेळू लागला. संघाला विजयी करून देणारी कामगिरी करायच्या ध्येयाने भारावून मैदानात उतरू लागला. लय सापडल्यावर संजू सॅमसनने बॅट हाती घेत काय धुमाकूळ घातला, ते सगळ्यांना माहीत आहे.
खराब काळातही ध्येयांचा, स्वप्नांचा पाठलाग सोडायचा नाही. स्वप्न त्यांचीच सत्यात उतरतात, जे स्वप्न बघतात आणि ती सत्यात उतरावी म्हणून सातत्याने कष्ट करतात. सॅमसन आणि ईशान किशनच्या कामगिरीने हा एक मोठा संदेश आपल्या सगळ्यांसाठी मिळाला आहे.
अनेक विक्रम मोडीत काढत भारतीय संघाने टी-२० विश्वचषक यजमान असताना लागोपाठ दुसऱ्यांदा आणि एकूण विक्रमी तिसऱ्यांदा जिंकून दाखवला. तसे बघायला गेले तर २०२४ पासून भारतीय क्रिकेट संघांनी जे सातत्य दाखवले आहे, ते वाखाणण्याजोगे आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२४चा टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर जणू फटाक्यांची माळ लागली आहे. १९ वर्षांखालच्या मुलींच्या आणि मुलांच्या दोन्ही भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. महिलांनी पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले. पुरुष संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता २०२६चा टी-२० विश्वचषक जिंकला. याला सातत्यपूर्ण कामगिरी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? कसोटी क्रिकेटमधली झालेली घसरण चिंता करण्याजोगी असली तरी व्हाइट बॉल क्रिकेटमधला सातत्यपूर्ण खेळाचा जबरदस्त दबदबा नाकारता येणार नाही.