

Ashadhi Wari
esakal
‘माझे जिवींची आवडी, पंढरपुरा नेईल गुढी’... संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी ही अभिलाषा व्यक्त केली. पंढरीची आषाढी वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ती आध्यात्मिक यात्रा आहे, तशीच ती जीवनाला आकार देणारी पाठशाळाही आहे. संतांच्या संगतीने चालत जाणे म्हणजे शारीरिक साधना, मुखाने नामस्मरण करणे म्हणजे वाचिक साधना आणि विठुरायाचे अखंड स्मरण म्हणजे मानसिक साधना होय. ही साधना तुम्हाला निश्चित ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे, हे शिकवते. हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
आषाढी वारी म्हणजे फक्त चालणे नाही, तर स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे. आजच्या धावपळीच्या, डिजिटल जगात हरवलेल्या तरुणांसाठी ही वारी म्हणजे ‘रिसेट बटण’ आहे. इथे ना दिखावा, ना स्पर्धा; इथे आहे समता, प्रेम आणि समाधान. म्हणूनच वारी तरुणांनी करावी, कारण ती शरीरापेक्षा मन आणि विचारांना अधिक चालना देते, जीवनाचा खरा अर्थ समजावते आणि स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकवते.
वारी करायला वयस्करच जातात, असा काहींचा समज आहे. तो बदलण्याची गरज आहे. खरंतर वारी ही तरुणांसाठीच आहे. आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी, स्वतःला ओळखायचं असल्यास वारीसारखा सोपा आणि सुंदर मार्ग दुसरा नाही. जीवनाचा अर्थ समजावून सांगताना ती तुम्हाला कधी अध्यात्मातील गर्भितार्थ समजावून सांगते, हेच अनेकांना समजत नाही.