राजेंद्र पा. केरकर
आपली भूक शमवण्यासाठी आदिमानवाने जंगली श्वापदांची शिकार जरी केली असली, तरी अन्न, वस्त्रांसाठी तो वृक्षवल्लींवर जितका विश्वासून होता, तितका अन्य घटकांवर त्याचा विश्वास अभावानेच होता. वनस्पती त्याला केवळ अन्न पुरवत नसत, तर रोगराईच्या प्रसंगी आवश्यक औषधे पुरवण्यात आणि उन्हापासून सावली व आसरा देण्याच्या दृष्टीने मदत करीत असत. यासाठीच त्याने प्राण्यांपेक्षा वनस्पतींचे पूजन करण्यात अधिक धन्यता मानली. अश्मयुगीन मानवाने हरिण, बैल, काळवीट, गवा, रेडा इत्यादी जंगली श्वापदांची प्रस्तर रेखाचित्रे प्रामुख्याने काढली असली, तरी वड, पिंपळ यांसारख्या वृक्षांच्या पूजनालाही विशेष महत्त्व दिले.