

Ancient Indian king reviewing Prakrit manuscripts with female court poets
esakal
गाथासप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्रीयत्त्वाचा ऐतिहासिक स्रोत आहे. महाराष्ट्रीय समाजाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, कौटुंबिक जीवनाची पूर्वावस्था या ग्रंथात आढळते. महाराष्ट्रीय समाज सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कोणत्या संकल्पनेत जगात होता, याचे स्रोत या ग्रंथात दिसतात. कविता करणाऱ्या मरहट्ट स्त्रिया होत्या ही बाब वेगळी आहे. रोहाबाई व शशीप्रभाबाईच्या गाथा आहेत. एवढेच नव्हे तर त्या काळातल्या बहुतांश सांस्कृतिक धारणा आजच्या समाजातही अस्तित्वात असलेल्या दिसतात. म्हणून हा ग्रंथ महाराष्ट्रीयत्त्वाचा ऐतिहासिक स्रोत ठरतो.
रा जा हाल याने एक कोटी गाथांमधून सातशे गाथा निवडल्याचा उल्लेख गाहा सत्तसईमध्ये म्हणजेच गाथासप्तशतीमध्ये आहे. हाल या गाथांचा केवळ संग्राहक-संपादकच नाही, तर तो काही गाथांचा कर्ताही आहे. भारतीयांना या गाथा-संकलकाची पहिली ओळख आल्ब्रेख्त फिड्रिख वेबर या थोर जर्मन पंडिताने इ. स. १८८१मध्ये करून दिली. त्यानेच गाहा सत्तसईची पहिली प्रत संपादित केली. अनेक विद्वानांच्या मते गाहा सत्तसई हा प्रथम गाथा कोश असावा आणि पुढे नवव्या शतकापर्यंत त्या कोशामध्ये भर पडत जाऊन सध्या अस्तित्वात असणारा गाहा सत्तसई हा ग्रंथ तयार झाला. या ग्रंथावर सुमारे १८ टीका आहेत. त्यामध्ये कुलनाथ, गंगाधर, पीतांबर, प्रेमराज, भुवनपाल, साधारण देव यांच्या टीका महत्त्वाच्या असून बहुतेक टीकाकारांनी गाथांचे अर्थ शृंगारिक दृष्टीनेच लावले आहेत. या ग्रंथाचे अनुकरण करून प्राकृतमध्ये वज्जालग्ग, गाथासहस्त्री, संस्कृतमध्ये आर्यासप्तशती आणि हिंदीमध्ये बिहारी सतसई अशा रचना झाल्या आहेत. मम्मट, वाग्भट, विश्वनाथ, गोवर्धन इत्यादी श्रेष्ठ अलंकारशास्त्रज्ञांनी याची स्तुती केली आहे, शिवाय ह्या संग्रहातील गाथा इतर अलंकारांची उदाहरणे देण्यासाठी अनेकांनी नमूद केल्या आहेत, हे याचे वैशिष्ट्य होय. सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील बारीकसारीक घटनांचे चित्रण या गाथांमध्ये आढळते. त्यामुळे वाचकाला तत्कालीन समाजाची उत्तम ओळख होते. म्हणूनच ऐतिहासिकदृष्ट्याही हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे.