

Women Empowerment Pune
esakal
सागर गिरमे
पुण्याच्या पेठांच्या गर्दीत, झोपडपट्ट्यांच्या अरुंद गल्ल्यांतून आणि ग्रामीण भागातील पायवाटेवरून चालणाऱ्या हजारो महिलांच्या अंधःकारमय आयुष्याला संघर्षाकडून स्वावलंबनाच्या प्रकाशाकडे नेणारा ‘ज्ञानदीप’ समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे.
आपल्या कर्तृत्वाने समाजासाठी काहीतरी घडवू पाहणाऱ्या, महिलांसाठी स्वावलंबनाची वाट दाखवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना ‘तनिष्का’ व्यासपीठाच्या उपक्रमांच्या निमित्ताने नेहमीच भेटणे होते. यामध्ये वेगवेगळ्या संस्था, कर्तृत्ववान व्यक्तींना भेटण्याची संधी मिळते. अशाच एका उपक्रमाच्या निमित्ताने शांत आणि संयमी, पण डोळ्यांत समाजाविषयीची तळमळ असणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाशी माझी भेट झाली... विजया दहिफळे. त्यांच्याशी तनिष्काच्या निमित्ताने चर्चा झाली. विजयाताईंनी त्यांच्या संस्थेच्या कामाविषयी सांगितलेल्या गोष्टींनी माझी उत्सुकता वाढवली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून काम केलेल्या एका महिलेने, गेल्या तीन तपांपासून तळागाळात जाऊन महिलांसाठीचे मोठे काम उभे केले आहे, हे त्यांच्याशी बोलताना लक्षात आले. त्यानंतर काही दिवसांनी मी त्यांच्या ‘ज्ञानदीप जनकल्याण फाउंडेशन’च्या मुख्य कार्यालयात पोहोचलो. पुण्यातील पेठांमधली नेहमीची वर्दळ आणि गजबजाट ओलांडून आत गेल्यावर समोर दिसलेले चित्र दिलासा देणारे होते. एका बाजूला संगणकाचा सराव करणाऱ्या तरुणी होत्या, दुसऱ्या बाजूला ब्यूटी थेरपीचे बारकावे शिकणाऱ्या महिला होत्या, तर काहीजणी गृहोद्योगाचे धडे घेत होत्या. हे केवळ प्रशिक्षण केंद्र नव्हते, तर ती महिलांची स्वप्न साकारणारी फॅक्टरी होती. या ठिकाणी रोज शेकडो महिला आपल्या जगण्याला नवा आकार देत होत्या, हे तिथे भेट दिल्यावर उलगडत गेले.