योगिराज प्रभुणे
जगभरातील शहरी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून मेट्रो पुढे येत आहे. मेट्रोचे जाळे विस्तारल्याने शहरांतर्गत प्रवासाचा वेग वाढल्याचे विविध अभ्यासांतून स्पष्ट झाले. सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणस्नेही प्रवासामुळे मेट्रो शहरी नागरिकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र सहजतेने दिसते.
जगात मेट्रो सुरू झाल्यानंतर १२१ वर्षांनी भारतात पहिली मेट्रो धावली. त्यानंतर आता २२ वर्षांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणले जाऊ लागले आहे. देशात सुसाट वेगाने धावणाऱ्या मेट्रो प्रगतीचा एक आढावा...
देशातील शहरे वेगाने वाढताहेत. शहरांच्या सीमा विस्तारत आहेत. स्थलांतरितांचे लोंढे देशातील प्रमुख शहरांच्या दिशेने वाहत असतात. विशेषतः १९९१मध्ये भारताने मुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर शहरीकरणाचा हा वेग वाढला.
नव्वदच्या दशकापर्यंत देशभरातील स्थलांतरितांचा कल दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई या महानगरांकडे होता. मात्र, १९९१नंतर हैदराबाद, बंगळूर आणि पुणे ही शहरे माहिती-तंत्रज्ञानाची केंद्रे म्हणून विकसित झाली.
पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर यापाठोपाठ ‘आयटी हब’ अशी नवीन बिरुदावली मिळाली. त्यामुळे शिक्षण आणि रोजगारासाठी पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाण या दशकात वाढल्याचे निरीक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने केलेल्या अभ्यासात नोंदविण्यात आले आहे.
पुण्यासारख्या शहरात २०००नंतर वाहतुकीच्या समस्यांनी डोके वर काढल्याचे निरीक्षण ‘यशदा’मध्ये झालेल्या ‘नॉन मोटराइल्ड ट्रान्स्पोर्ट’ या विषयावरील परिषदेत सार्वजनिक वाहतूक तज्ज्ञ डॉ. सुलभा जाधव यांनी नोंदविले आहे.