how Indian cinema is changing with technology
Esakal
स्नेहल बाकरे
भारतीय सिनेमा पारंपरिक चौकटी मोडून तंत्रज्ञान, कथाकथन व जागतिक व्यासपीठावर सीमोल्लंघन करीत आहे. बहुभाषिकता, ओटीटी, व्हीएफएक्स, आंतरराष्ट्रीय कलाकार यांतून तो बहुआयामी सांस्कृतिक प्रवाह होऊन जगभर विस्तारत, नवनवीन उंची गाठत आहे.
दसरा हा केवळ सण नाही, तर प्रभू श्रीरामांच्या सीमोल्लंघनाची स्मृती आहे. अन्यायाचा पराभव करून सत्य, धर्म आणि सद्गुणांची स्थापना करणाऱ्या रामकथेतून सीमोल्लंघनाचा खरा अर्थ समजतो. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन, अशक्य वाटणाऱ्या कल्पना सत्यात उतरवणे. मानवाने नेहमीच आपल्या मर्यादांच्या कक्षा ओलांडत प्रगती साधली आहे. मग ती अवकाशाला गवसणी घालण्याची असो, महासागर पार करण्याची असो, विज्ञानाच्या चमत्कारांतून नवनवीन शोध घेण्याची असो किंवा कलेच्या विश्वातून नवनवीन कल्पना मांडण्याची असो, प्रत्येक क्षेत्रात सीमोल्लंघनाची परंपरा दिसून येते.
प्राचीन काळातील तत्त्वज्ञान, गणित, योग, वैदिकशास्त्रे ते आधुनिक काळातील तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता अशी ही भारताची अखंड भरारीच सीमोल्लंघन संकल्पनेची साक्ष देते. या व्यापक प्रवाहाचा परिणाम भारतीय चित्रपटसृष्टीवरही झाला असून, तिच्या प्रयोगशीलतेत सीमोल्लंघनाची छटा दिसून येते.