

ॲड. सुकृत देव
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी सर्वप्रथम आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ‘अर्थ’कारण किंवा ‘आर्थिक नियोजन’ म्हणजे सोप्या शब्दांत पैशांचे नियोजन. पैसा पाण्यासारखा असतो; हातातून कधी निसटेल सांगता येत नाही. तुम्हाला मिळणाऱ्या पैशांचे उत्तम नियोजन कसे करायचे हे माहीत असणे आवश्यक आहे.
जीवनशैली बदलली, तसे घरखर्च वाढले आहेत, राहणीमान बदलले आहे. मागण्या वाढल्या आहेत, उदाहरणार्थ, पॉश लोकॅलिटीमध्ये नवीन घर हवे, पॉश कार हवी, घरामध्ये सर्व सुखसुविधा हव्यात; दर वीकएंडला हॉटेलिंग, पर्यटनासाठी देशविदेशवारी इत्यादी.
पुढे जाऊन मुलांचे संगोपन, त्यांची शिक्षणे यांचेही खर्च असतात. म्हणून उत्पन्न पाहून नियमित खर्च आणि हौसेमौजेसाठी लागणारे पैसे यांचे बजेटिंग करणे गरजेचे आहे. उत्पन्नाच्या तुलनेत भरमसाठ खर्च झाले, तर आर्थिक गणिते बिघडू शकतात.
म्हणूनच आत्ताचे खर्च आणि भविष्यासाठीची बचत, गुंतवणूक या सर्व गोष्टींचा विचार, त्याची परिपूर्ण गणिते नवीन जोडप्यांनी पहिल्याच दिवसापासून तंतोतंत बसवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक नियोजन लगेचच सुरू करायला हवे.
नवविवाहित दांपत्यामध्ये दोघेही कमवत असतील, तर दोघांना मिळणारे पैसे (मासिक किंवा वार्षिक) किंवा एकुणात आर्थिक स्थिती कशी आहे, हे दोघांनीही समजून घ्यावे आणि आर्थिक नियोजन करावे.