

Tribal Folk Art of Eastern India
esakal
वर्षा गजेंद्रगडकर
सोहराई चित्रांची परंपरा टिकवण्यासाठी व्यक्ती, संस्था, मोठे उद्योग आणि शासन या सर्वांनी एकत्र येऊन विशेष प्रयत्न करणं आवश्यक आहे. नैसर्गिक अधिवासातून ज्यांना बाहेर पडावं लागतंय किंवा ते नैसर्गिक अधिवासच जिथे नष्ट होतायत, त्या सोहराई चित्रांना नव्या घरांची गरज आहे. ती त्यांना देण्याची जबाबदारी आपली आहे.
काही वेळा काही प्रदेशांना फार मोठं वलय किंवा लोकप्रियता लाभत नाही. तसं झारखंडच्या बाबतीत आहे. बिहारचा काही भाग वेगळा करून जेमतेम पंचवीस वर्षांपूर्वी निर्माण झालेलं हे पूर्व भारतातलं राज्य! झारखंड हे नाव, ही जंगलांची भूमी असल्याचं स्पष्ट करत असलं, तरीही जमशेदपूरमुळे आपण त्याला औद्योगिक ओळखच अधिक दिली आहे. मात्र इथले धबधबे, बेटला राष्ट्रीय उद्यान, सतराव्या शतकातलं जगन्नाथ मंदिर या सगळ्यांइतकीच इथली एक हस्तकला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या कलेला भौगोलिक मानांकन मिळालं असलं, तरी आजही ती काहीशी अपरिचितच राहिली आहे.