

Keeladi Excavation
esakal
राकेश मोरे - sakal.avtaran@gmail.com
तमिळनाडूमधील वैगई नदीच्या काठावर वसलेल्या किलाडीच्या उत्खननातून सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीच्या विकसित नागरी जीवनाचे पुरावे मिळाले आहेत. या अवशेषांमधून त्या काळातील लोकांचे दैनंदिन जीवन आणि राहणीमान समोर येते; परंतु ते कोण होते, कुठून आले आणि त्यांचा आजच्या भारतीय समाजाशी किती जुना संबंध होता, हे शोधण्याचे आव्हान संशोधकांसमोर आहे. आधुनिक विज्ञानाच्या मदतीने किलाडीच्या मातीत दडलेली ही कहाणी उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भारतीय संस्कृतीचा उगम आणि तिचा प्रसार याबाबत उत्तर अन् दक्षिण भारताच्या संदर्भात दीर्घकाळ चर्चा होत आली आहे. भारतीय संस्कृती, भाषा, धर्म आणि सामाजिक परंपरा यांचा मुख्य प्रवाह उत्तर भारतातून सुरू झाला आणि त्याचा प्रभाव पुढे संपूर्ण देशावर पडला, अशी एक पारंपरिक धारणा आहे. त्यामुळे भारतीय उपखंडातील प्राचीन नागरी संस्कृतीचा इतिहास सांगताना सिंधू संस्कृती आणि त्यानंतरच्या उत्तर भारतातील नागरी केंद्रांवर मोठा भर राहिला. तमिळनाडूमधील वैगई नदीच्या काठावर वसलेल्या किलाडीमध्ये इसवी सन पूर्व ५८०च्या शहरी संस्कृतीचा पुरावा सापडला आहे. हा शोध भारतीय उपखंडाच्या इतिहासात एक नवीन पैलू जोडतो.