

Arun Shewate Talghar Poetry Collection Review
esakal
मयूर भावे
प्रेयसीपासून आईपर्यंत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून निवडणुकांपर्यंत, कावळ्यांपासून बगळ्यांपर्यंत आणि उन्हापासून पावसापर्यंत कोणत्याही विषयावर त्याच तन्मयतेनं, सच्चाईनं आणि पोटतिडकीनं लिहिणारा हा कवी असा कसा?
अवचितपणे एखाद्या संध्याकाळी घरात वर्षानुवर्षं जपलेलं गाठोडं कपाटातून काढावं, लौकिकार्थाने त्यातल्या काही अर्थपूर्ण, तर काही अगदीच निरर्थक गोष्टींना पुन्हा पुन्हा पाहावं, ‘खरं म्हणजे हे टाकून द्यायला हवं...’ असं स्वतःशीच म्हणत एखादी वस्तू हातात घोळवत घोळवत शेवटी ‘असू दे... बघू नंतर...’ असं म्हणून पुन्हा तशीच ठेवावी... या कृतीला जबाबदारी म्हणावं, तर ती कोणीही आपल्यावर टाकलेली नसते आणि काम म्हणावं तर त्यातून हाती काहीही लागणार नसतं, तरीही प्रत्येक जीव असं एखादं गाठोडं उराशी बाळगून असतो. ते नावाला त्याचं असलं, तरी त्यात भवतालाचे कित्येक संदर्भ असतात, घटनांचे मणी ओवणारे धागे असतात, माणसांचे कढ-उसासे-हास्याचे कल्लोळ-प्रेमाचे हुंकार आणि हतबलतेचे आवाजही असतात. त्यामुळे ही कृती असते ‘आठवणींचा रियाज’!