

ऋतूंची सांगड हे महाराष्ट्रीय सणांचं वैशिष्ट्य. महाराष्ट्र रांगडा आणि दगडांचा देश आहे खरा, पण वर्षभर येणारे सण, त्या त्या ऋतूंनुसार सणांना आरोग्याला हितकारक पदार्थ खाण्याची इथल्या संस्कृतीची खासियत आहे. महाराष्ट्र शेतीप्रधान प्रदेश आहे, त्यामुळे पेरणी, सुगी, ऋतूपालट यांच्याशी इथले सण संबंधित आहेत.
महाराष्ट्रात पहिल्यापासून भिन्न संस्कृती नांदत आलेल्या आहेत. खाद्यसंस्कृती हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रावर अनेक आक्रमणं झाली. काही आक्रमक नंतर याच प्रदेशात आपापल्या रीतिरिवाजांसह स्थायिक झाले. महाराष्ट्रालगत गोवा, गुजरात, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश प्रांत आहेत. सीमावर्ती प्रदेशातल्या लोकांच्या चालीरीतींचा प्रभावही महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आहे. महाराष्ट्रामध्ये पारशी समाज स्थायिक आहे. ख्रिश्चन, ज्यू, अँग्लो-इंडियन, ईस्ट इंडियन, जैन, बौद्ध, मुस्लिम, बोहरी अशा वेगवेगळ्या समाजांचे, भिन्न संस्कृतींचे लोक इथं राहतात.
महाराष्ट्राच्या भूगोलाचा विचार केला तर खानदेश, मराठवाडा, विदर्भ-वऱ्हाड, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, अपरांत देश आणि आदिवासी भाग असा विचार करावा लागतो. महाराष्ट्रातला दलित समाज हा इथल्या संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. शाहू पाटोळे यांनी त्यांच्या अन्न हे अपूर्णब्रह्म या पुस्तकात उपलब्ध वस्तूंचा वापर आणि जगण्याचा संघर्ष हा पाया असलेले या समाजाचे पारंपरिक खाद्यपदार्थ उलगडून दाखवले आहेत. महाराष्ट्रात वांशिक, धार्मिक, भाषिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या रुचीवैविध्य आहे.
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीही मुळात ‘महा’ आहे. त्यावर काही लिहावं, तर तो एक महाग्रंथच होईल. महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती मला ‘महाकॅलिडोस्कोप’सारखी वाटते. कॅलिडोस्कोप जरा हलवला, की वेगवेगळ्या रंगीबेरंगी मनमोहक रचना दिसतात. अगदी तसंच सण, श्राद्ध, ऋतू, इतिहास, भूगोल, जाती, धर्म अशा वेगवेगळ्या कोनांतून महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती वेगवेगळी दिसते.