sahitya sammelan
Esakal
संजय नहार
दिल्लीतील ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी अस्मितेचा नवा इतिहास घडवणारे ठरले. तालकटोरा स्टेडियममध्ये मराठी माणसांचा उत्साह; पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि डॉ. तारा भवाळकर यांच्या योगदानाने संमेलन देशभर गाजले. पुस्तक प्रदर्शन, कविसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी दिल्ली पूर्ण महाराष्ट्रमय झाली, तसेच मराठी माणसासाठी दिल्ली आता जवळच वाटेल, असा संदेश ठळकपणे यातून गेला.
साप्ताहिक सकाळच्या २०२१च्या दिवाळी अंकात ‘न झालेले साहित्य संमेलन’ या शीर्षकाखाली दिल्लीत न झालेल्या संमेलनाबाबत लिहिले होते. सरहद संस्थेतर्फे पंजाबमधील घुमानमध्ये ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केल्यानंतर दिल्लीमध्ये साहित्य संमेलन आयोजित करणे सोपी गोष्ट नाही, असा असलेला गैरसमज दूर करण्यासाठी २०१९साली दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा प्रस्ताव संस्थेने महामंडळाकडे दिला होता. त्यानंतर काय घडले त्याविषयी त्यात लिहिले होते.
खरेतर २०१४मध्ये घुमान येथे झालेले साहित्य संमेलन हे एका अर्थाने मराठी भाषा व संस्कृतीचे ‘अटकेपार संमेलन’ ठरले. त्यावेळी आमच्या मनात एक व्यापक भूमिका होती. संत नामदेव महाराजांच्या स्मृतिस्थळावर असलेल्या भेट वहीमध्ये (व्हिजिटर्स डायरी) आचार्य विनोबा भावे यांनी लिहिले आहे, जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही; तो पंजाब संत नामदेवांनी प्रेमाने जिंकला. त्या वाक्याचा प्रत्यय घुमानला आलेल्या प्रत्येक साहित्यरसिकाला आला.