कौस्तुभ केळकर
आपली आर्थिक क्षमता, आर्थिक उद्दिष्टे, विविध गरजा, विविध टप्प्यांवर करावे लागणारे अपेक्षित खर्च याबाबत स्पष्टता असेल आणि त्यानुसार गुंतवणुकीचे नियोजन केले, तर गरज पडणाऱ्या टप्प्यांवर आपल्याला परतावा मिळून आवश्यक तो खर्च करता येतो. म्हणजेच गुंतवणुकींतून ‘अक्षय्य’ परतावा मिळू शकतो.
आजचा काळ वाढत्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांचा आहे. तसेच लोकांचे एकंदर आयुष्यमान वाढले आहे; जीवनशैली सुधारत आहे. हे युग इंटरनेट, मोबाईल आणि पर्यायाने माहितीचे आहे. एखादी घटना, माहिती किंवा एखादी संधी असेल, तर ती वेगाने अनेकांपर्यंत पोहोचते. चांगले जीवन जगायचे असेल, स्वतः उच्च शिक्षण घ्यायचे किंवा मुलांना द्यायचे असेल, तर हातात पैसा असला पाहिजे. एखादी वस्तू/ सेवा आकर्षक किमतीला मिळत असेल आणि त्याची गरजही असेल तर ती वस्तू/ सेवा मिळवण्यासाठी पैसे असणे गरजेचे असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पैसा योग्य मार्गाने आणि प्रामाणिकपणे मिळवला पाहिजे, तरच त्याचा निखळ आनंद घेता येतो.