फूड इंडस्ट्री|गणेश शेट्टी
हॉटेल व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल, तर फक्त पाककौशल्य पुरेसं नसतं. नवीन चव, ट्रेंड्स, तंत्रज्ञान, ग्राहकांची पसंती यांचं भान ठेवणं आवश्यक असतं. सतत नवं काहीतरी शिकण्याची भूक हाच खरा मसाला आहे, आणि तोच हॉटेल व्यवसाय टिकवतो व यशाच्या वाटेवर घेऊन जातो.
हॉटेल उद्योग म्हणजे आज भव्य रेस्टॉरंट्स, गगनाला भिडणाऱ्या बिल्डिंग्स, युनिफॉर्ममधले वेटर्स, कलाकृतीसारखे सादर केलेले पदार्थ असे लोभस चित्र आपल्याला सहजतेने दिसते. पण इथपर्यंतचा प्रवास फारसा सहजसोपा नव्हता. तो खडतर होता, गरजेचा होता आणि थेट माणसाच्या पोटाशी जोडलेला होता.
हॉटेल संस्कृतीची खरी सुरुवात झाली मुंबईमध्ये. १९५० ते ६०च्या दशकात गावाकडून मुंबईत आलेल्या चाकरमान्यांची संख्या झपाट्याने वाढत होती. हातात ट्रंक, डोक्यावर गाठोडं आणि डोळ्यांत स्वप्नं घेऊन आलेल्या या कामगारांसाठी शहर अनोळखी होतं आणि त्याहूनही मोठी अडचण होती ती जेवणाची.
तेव्हा हॉटेल्स नव्हती, मेसदेखील सुरू झाल्या नव्हत्या. घरून डबा घेऊन येणे केवळ अशक्यप्राय होते. म्हणूनच त्यांच्या गरजेतूनच शहरात हातगाड्या, टपऱ्या आणि छोट्या खानावळी सुरू झाल्या. कुठे वडापाव, कुठे भजी, कुठे आमटी-भात, कुठे गरम पोळीभाजी अगदी लवकर तयार होणारे, सहजपणे परवडणारे पदार्थ दिले जात असत. ही ठिकाणं ‘हॉटेल’ म्हणून ओळखली जाऊ लागली खरी, पण प्रत्यक्षात ती होती उद्योगाच्या रूपानं निर्माण झालेली गरज.