

Organic Farming India Benefits
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच तमिळनाडूमध्ये बोलताना शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. कोइमतूर येथे झालेल्या दक्षिण भारतीय नैसर्गिक शेती संमेलनाला त्यांनी हजेरी लावली होती, त्यात त्यांनी हे आवाहन केले. शेतकऱ्यांनी जमिनीच्या थोड्या थोड्या भागापासून ही सुरुवात करावी आणि रासायनिक खते व कीटकनाशके यांच्यावरचे अवलंबित्व कमी करावे असे त्यांनी सांगितले. मोदी यांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे हरितक्रांती किंवा भरघोस उत्पादन घेण्याच्या स्पर्धेत देशी शेतीकडे दुर्लक्ष झाले. दुर्लक्ष अशाकरिता झाले, की त्यावेळची आपली गरज वेगळी होती. वाढती लोकसंख्या आणि परदेशातून मागवण्यात येणाऱ्या अन्नधान्याची संख्या यांचे गणित जुळत नव्हते.
त्यामुळे आपण परदेशी वाणाची बरीच उत्पादने स्वीकारली. मात्र या सगळ्यात आपल्या देशी वाणाकडे व इथल्या शेतीपद्धतीकडे आपले दुर्लक्ष झाले, कारण आपल्याला उत्पादन सर्वाधिक हवे होते. त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी हवा होता व अन्नधान्यावर पडणारी कीड नको होती. त्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपण परदेशातून आलेली हायब्रीड पद्धतीची वाणे स्वीकारली. येथे धान्याचे तसेच भाजीपाल्याचे उत्पादन वाढवले. मात्र या सगळ्यात आपण कमी दर्जाचे धान्य तयार करत आहोत व ते आपल्या आरोग्याला उपकारक नाही याचे भान सुटले.