

Pushpadanta and Ancient Marathi
esakal
डॉ. नागनाथ बळते
प्रत्ययप्रक्रियेच्या अभ्यासात सर्वनामांना अग्रस्थान द्यावे लागते, कारण भाषेच्या उत्पत्तीत सर्वनामांपासूनच प्रत्यय आणि क्रियावाचक शब्दांपासून इतर शब्दप्रकृती निर्माण होत गेल्याचे मानले जाते. पुष्पदंताच्या काळात एकवचन व अनेकवचन ही दोनच वचने प्रचलित होती आणि लिंगाबाबत निश्चित नियम नव्हते. या दोन्ही गोष्टी आधुनिक मराठीतही कायम आहेत.
मराठी ग्रंथरचनेची सुरुवात बाराव्या शतकात झाली असा समज प्रचलित असला, तरी मराठी भाषेचा इतिहास त्यापेक्षा अधिक प्राचीन आहे. ज्ञानेश्वरी हा तेराव्या शतकातील अभिजात मराठीचा उत्कृष्ट नमुना असला, तरी तो ग्रंथ अनेक शतकांच्या भाषिक विकासाचे फलित आहे. इसवी सनाच्या आठव्या शतकातच मराठीने स्वतंत्र भाषिक अस्तित्व प्राप्त केले होते, याचा पुरावा कुवलयमाला, शिलालेख आणि ताम्रपट यांतून मिळतो. यादवकालीन मराठीचा अभ्यास झालेला असला, तरी राष्ट्रकूटकालीन मराठीचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विशेषतः महाकवी पुष्पदंत यांच्या वाङ्मयाच्या आधारे, करणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासासाठी तौलनिक दृष्टिकोन आवश्यक आहे. अपभ्रंश साहित्याच्या तुलनेतून अर्वाचीन आर्यभाषांचा सुसंगत इतिहास मांडता येतो. मराठीच्या संदर्भात काही अपभ्रंश समजण्यावर संबंधित वाङ्मय अप्रकाशित असल्याने मर्यादा असल्या, तरी उपलब्ध साधनांच्या आधारे विश्वसनीय निष्कर्ष काढता येतात. या अभ्यासाची प्रमुख साधने म्हणजे महाकवी पुष्पदंत यांचे महापुराण, नागकुमारचरित आणि यशोधरचरित, तसेच ज्ञानेश्वरपूर्वकालीन शिलालेख व ताम्रपट. तुलनेसाठी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हे प्रमाणभूत ग्रंथ मानले जातात. महानुभाव वाङ्मय सांकेतिक लिपीत असल्याने त्याचा वापर सावधपणे करावा लागतो. या भाषिक पुराव्यांच्या विश्लेषणावरच संशोधनाचे निष्कर्ष आधारलेले असतात.