Bharatnatyam
Esakal
हेमलता अंतरकर
रमाजींचा अवतरण हा प्रयोग म्हणजे केवळ परंपरेला केलेला दंडवत नाही. परंपरा अजूनही काय करू शकते याचा तो उद्घोष आहे. आपल्या शरीरातून, वाणीमधून आणि चैतन्यामधून त्या एका प्राचीन संहितेला नवजीवन प्रदान करतात. आपल्याला स्मरण करून देतात, की नृत्य म्हणजे केवळ करमणूक नाही, ते एका तात्त्विक प्रबंधाला हालचालींतून सादर करू शकतं. नृत्य एक प्रार्थना आहे, एक आवाहन आहे, एक मार्गिका आहे.
जूनच्या अखेरीस भर पावसात मी चिन्मय विभूती या पुण्यातल्या कोळवणमधल्या स्वामी चिन्मयानंद केंद्राला भेट दिली. निमित्त होतं स्वामी तेजोमयानंद यांच्या ७५व्या वाढदिवसाचं.
तिथे मला रमा भारद्वाज या भरतनाट्यम् नर्तकीचा एक अनोखा प्रयोग पाहायला मिळाला. ‘अवतरण’ शीर्षकाच्या या प्रयोगात कथाकथन आणि नृत्य यांचा अनोखा मिलाफ रमाजींनी साधला आहे.
वझुवूर रमैय्या पिल्लई, कमलाजी आणि वेन्पती चिन्ना सत्यम यांच्यासारख्या गुरूंकडून, भरतनाट्यम् आणि कुचिपुडी या दोन्ही नृत्यप्रकारांचं प्रशिक्षण रमाजींनी घेतलेलं आहे. त्या फक्त या नृत्यप्रकारांमध्येच नव्हे, तर ज्या समृद्ध तत्त्वज्ञानामधून त्यांचा उगम झाला त्या परंपरेतही लीलया संचार करतात. ‘आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अंतःकरणपूर्वक शोध घेतो, तेव्हा आपल्या ध्येयाकडे नेणारी वाट आपोआप उजळत जाते!’ त्या त्यांच्या चेन्नई ते कॅलिफोर्निया या प्रवासाबद्दल बोलताना सांगत होत्या.