

150-million-year evolution, living vs dying rivers and conservation challenges
esa
नदी जेव्हा सखल भागात येते, तेव्हा तिला स्वतःचा असा वेग नसतो. वाट मिळेल तशी ती वाहत राहते, म्हणूनच नागमोडी वळणे घेत नदी वाहते. ही नागमोडी वळणे घेताना ती खूप काही निर्माण करत असते, छोटी-छोटी बेटे, रांजण खळगे. एका काठाला नदी खोदत जाते आणि दुसऱ्या काठावर गाळ पसरत जातो. जेव्हा आपण रुंदीकरण, खोलीकरण अशी कामे करत असतो, तेव्हा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असणे खूप आवश्यक असते. वाहणे आणि पूर येणे हे नदीचे अविभाज्य गुणधर्म आहेत.
कसे पर्वताने जलासी धरावे
जरी ग्रीष्म आला तरी पाझरावे
इथे जन्म घेती नद्या या कीतीशा
असे मानवाला जगाया पुरेशा ।।
किनाऱ्यामद्धे दोन सृष्टि वहाती
किती जीव त्याते सुखाने रहाती
नदीने सदाही असावे प्रवाही
तिची ओढ वाटे सदा सागराही ।।
(संदर्भ - नदीचे श्लोक - मोहित गोरखेडे)
हिंदू संस्कृती असो किंवा इजिप्तची नाईल संस्कृती, सगळ्या संस्कृती नदीकाठावरच बहरल्या आणि नद्या लुप्त होताच या संस्कृतीही लुप्त झाल्या. या प्रक्रियेला नैसर्गिक चक्र कारणीभूत होते. आपल्या देशाबद्दल बोलायचे झाले, तर काही मुक्तवाहिनी उदाहरणार्थ, अघनाशिनी, काही प्रमाणात शास्त्री, (कोकण, कर्नाटक, केरळ) तसेच काही हिमालयात उगम पावून अरुणाचल, मेघालयात वाहणाऱ्या काही छोट्या नद्या सोडल्या, तर आपली अवस्था खूप वाईट आहे. ज्या नद्या अजूनही चांगल्या किंवा मध्यम अवस्थेत आहेत, त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे त्या सगळ्या मुक्त आणि प्रवाही आहेत. तिथे अजूनही नैसर्गिक जंगले, झाडी, झरे काही प्रमाणात जिवंत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून मी नदीवर प्रत्यक्ष काम करत आहे. काम करताना रोज प्रकर्षाने जाणवते, की आज जगभर नद्यांची जी स्थिती झाली आहे, त्याची मूळ कारणे शोधायला हवीत. मुख्य म्हणजे नदी समजली पाहिजे. नदी समजली तर कारणे समजतील आणि कारणे समजली तर उपाय शोधता येतील. उपाय शोधायचा तर आधी नदीचे वय कळायला हवे. तुम्ही म्हणाल वयाशी काय संबंध? तर ती कशी घडली, हे कळल्याशिवाय काय सुधारणा करायच्या हे कसे कळणार? आपल्या या सर्व नद्यांचा जन्म कधी झाला असेल आणि त्यांचे वय काय, हे शोधण्यासाठी सगळ्यात आधी सह्याद्रीचा जन्म कधी झाला ते पाहावे लागेल. जेव्हा भूगर्भात अनेक घडामोडी झाल्या आणि गोंडवाना भूप्रदेश विभंगला (Faulting) तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी घडल्या. त्यातून दख्खनचे द्वीपकल्प, सह्याद्रीचे पश्चिम कडे आणि दख्खनचे पठार निर्माण झाले. यातही गमतीची गोष्ट म्हणजे सह्याद्रीमुळे दख्खनचे पठार पश्चिमेकडे उंच आणि पूर्वेकडे उतरते झाले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहुतेक मोठ्या नद्या पूर्वेकडे वाहतात. साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या या सह्याद्रीच्या पर्वतरांगा पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांच्या महत्त्वाच्या जल विभाजक ठरल्या. मग आता नद्यांचे वय काय असेल बरं? ज्वालामुखीमधून तयार झालेला हा अत्यंत कठीण कातळ फोडून, दर पावसाळ्यात नद्यांची खोरी कोरायला पुन्हा कित्येक कोटी वर्षांचा काळ जावा लागला. आपल्या नद्या काही फरकाने साधारण दीड ते दोन कोटी वर्षे वयाच्या आहेत.