

Guru Dutt Film
esakal
सुलभा तेरणीकर
रिळामागून रिळं उलगडतात. चित्रपट प्रदर्शित हातात. हिट होतात, सुपरहिट होतात. कधी प्रेक्षक पाठ फिरवतात. कधी गाणी डोक्यावर घेतात. १९६२च्या चित्रपटांत साहिब बीबी और गुलामसाठी मात्र काळ थबकतो... प्रेक्षकालाही आवडीनिवडीचा निर्णय घेता येत नाही. काळच ठरवतो... मात्र प्रतीक्षा अटळ असते. प्रोफेसरच्या ‘ऐ गुलबदन’ किंवा अनपदच्या ‘आपकी नज़रों ने समझा’ या गाण्यांच्या काळात, गीता दत्तचा ‘कोई दूर से आवाज़ दे चले आओ’चा दुखरा स्वर अस्वस्थ करतो...
का ग़ज़ के फूलच्या अपयशानंतर आणि चौदहवी का चाँदच्या यशानंतर गुरू दत्तच्या एका स्वप्नानं पुन्हा उचल खाल्ली आणि बिमल मित्र यांच्या साहिब बीबी और गुलाम या बंगाली कादंबरीचे हक्क त्यांनी विकत घेतले. अब्रार अलवी, लेखक बिमल मित्र यांच्याबरोबर खंडाळ्याला दोन महिने राहून, चर्चा करून हिंदी-उर्दूमध्ये १,३०० पानांची पटकथा तयार केली. छोटी बहूच्या भूमिकेसाठी नर्गिसला विचारलं होतं, पण तिनं नकार दिला. अखेर मीना कुमारीची निवड केली आणि ती योग्यच ठरली. भूतनाथ म्हणजे गुलामाच्या भूमिकेसाठी विश्वजीत आणि शशी कपूर यांचा विचार केला गेला होता, मात्र हे पर्याय दूर ठेवून गुरू दत्त स्वतः उभे राहिले. त्यांच्या एकूण भूमिकांमध्ये ही भूमिका श्रेष्ठ समजली जाते. बन्सीच्या भूमिकेसाठी त्यांचा प्रिय मित्र जॉनी वॉकर किंवा कन्हैय्यालाल यांच्याऐवजी धुमाळना निवडलं आणि धुमाळांनीही भूमिकेत गाहिरे रंग भरले. संगीतासाठी एस. डी. बर्मन आणि साहिर लुधियानवी यांना विचारलं होतं. पण बर्मनदा आजारी होते आणि साहिरनं नकार दिला. मग त्यांनी बंगाली संगीतकार हेमंत कुमारना बोलावलं आणि गीतकार म्हणून शकील बदायूनी यांना. तंत्र आणि आशय यात एक उंचीवर गेलेल्या साहिब बीबी और गुलाममधील गाण्यांसाठी गीता दत्तनं दुःख, गूढता, वेदनेनं भरलेला स्वर दिला. ‘कोई दूर से आवाज़ दे चले आओ’, ‘पिया ऐसो जिया में समाय गयो रे’, ‘न जाओ सैंया’ ही गाणी छोटी बहूसाठीच लिहिल्यासारखी वाटतात.