

Sant Namdev textual criticism
esakal
शासकीय गाथेत आलेले विषय पाहता संत नामदेवांनी त्या क्रमानुसार त्या रचना नक्कीच केलेल्या नसणार. त्यांच्या रचनांचा (आख्यानकाव्य सोडले तर) तो क्रम मागे-पुढेसुद्धा होऊ शकतो; पण नामदेवांच्या सगळ्या गाथांत हा क्रम लावून त्या संहितेची निश्चिती करण्याचे कार्य ज्या अभ्यासकांनी केले त्यांचे उपकार मानून पुढे जाणे हे आपले कर्तव्य ठरते.
संत नामदेवांच्या वाङ्मयाची चिकित्सा करायची झाली, तर आधी त्यांच्या वाङ्मयाची किंवा संहितेची मूळ निश्चिती होणे गरजेचे आहे. प्राचीन किंवा मध्ययुगीन साहित्याची किंवा काव्याची चिकित्सा करताना आधी मूळ संहिता निश्चित करणे अगत्याचे ठरते, आणि संत नामदेवांच्या बाबतीत तर ते अधिक महत्त्वाचे आहे. मराठी संत साहित्यात अनेक वेगवेगळ्या समकालीन आणि उत्तरकालीन संतांनी केलेली रचना, केवळ नामसादृश्यामुळे ती संत नामदेवांचीच रचना आहे, असा समज अनेकांचा झाल्यामुळे संत नामदेवांच्या चरित्राचासुद्धा विपर्यास झाल्याचे दिसून आले. संत नामदेव एक की अनेक येथपासून संत नामदेव हे दरोडेखोर होते इथपर्यंत त्यांच्या चरित्राला विकृत करण्याचा प्रयत्न झाला. मराठीतल्या विदुषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गाबाई भागवत यांनीसुद्धा याच संदर्भांना समोर ठेवून संत नामदेव हे तरुणपणी दरोडेखोर होते, असा उल्लेख आपल्या वक्तव्यातून केला होता. संत नामदेवांप्रमाणेच नामा शिंपी, विष्णुदास नामा, केशवदास नामा, नामा यशवंत, नामा पाठक अशा नाममुद्र घेऊन आलेले लेखन हे संत नामदेवांचेच होय असा समज मधल्या काळात अभ्यासकांचा झाला होता.