

Fasting Health Benefits
esakal
डॉ. सुबोध देशमुख
श्रावणात उपवास करण्याचा मुख्य उद्देश पोटाला विश्रांती देणे होता, मात्र आजकाल उपवासाच्या दिवशीच लोक जास्त खातात. सकाळी साबुदाणा खिचडी, दुपारी बटाट्याचा कीस, संध्याकाळी साबुदाण्याचे वडे किंवा शेंगदाणे यांमुळे शरीराला नेहमीपेक्षाही दुप्पट कॅलरीज मिळतात. पोटाला विश्रांती मिळण्याऐवजी त्याच्यावर पचनाचा दुप्पट ताण पडतो.
पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सध्या सुरू आहे. आपल्याकडे श्रावणात बहुतांश घरात उपवासाचे व्रत पाळले जाते. कोणी श्रावणी सोमवार पाळते तर कोणी महिनाभर हलका आहार घेते. पूर्वीच्या काळात ऋतुबदलामधून शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी आणि पचनसंस्थेला विश्रांती देण्यासाठी उपवासाची ही सुंदर परंपरा सुरू झाली असावी. मात्र, आजच्या काळात उपवासाच्या नावाखाली तळलेले साबुदाण्याचे वडे, बटाटे आणि शेंगदाणे खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. आधुनिक विज्ञानानेही उपवासाला ‘ऑटोफॅजी’ म्हणजेच शरीराची अंतर्गत स्वच्छता करणारी नैसर्गिक पद्धत मानले आहे. श्रावणातील उपवासाचे धार्मिक महत्त्व टिकवून त्याचा आरोग्यासाठी कसा उत्तम फायदा करून घ्यावा हे खालील काही मुद्द्यांमधून सोप्या भाषेत समजून घेऊ या.