

Shri Guru Dehukar Maharaj Phad
esakal
प्रा. अशोक पाटील-महागावकर, बार्शी
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक जीवनाचा आत्मा मानला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज आदी संतांनी रुजविलेल्या भक्ती, समता आणि नामस्मरणाच्या विचारांचा प्रसार या फडाद्वारे केला जातो. या फडाने केवळ वारीची परंपरा टिकवून ठेवली नाही, तर संतवाङ्मयाचा प्रचार, हरिकीर्तन, समाजप्रबोधन आणि सात्त्विक जीवनशैलीचा संस्कार समाजात रुजविला. या परंपरेतील मानाचा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला फड म्हणजे श्रीगुरू देहूकर महाराज फड होय. आज या फडाची धुरा जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अकरावे वशंज श्रीगुरू बाळासाहेब ज्ञानेश्वर माउली देहूकर महाराज संभाळत आहेत.
सं त तुकोबारायांच्या कीर्तन, नामसंकीर्तन आणि हरिभक्तीच्या विचारांचा प्रसार या फडातून केला जातो. तुकाराम महाराजांच्या वडील घराण्याची एक शाखा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कायम वास्तव्यासाठी गेली. त्या शाखेतील श्रीगुरू वासुदेव महाराज देहूकर यांच्यापासून ही फड परंपरा सुरू झाली. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध दशमी, एकादशी, द्वादशी या तीन दिवशी पंढरपुरामध्ये वारकऱ्यांचा मेळा जमवून कीर्तन नगरप्रदक्षिणा, भजन, खिरापत असे विधी या तीन दिवसांत पार पडत असत. तिथूनच फड परंपरेला आरंभ झाला. त्याबरोबरच पायी दिंडी घेऊन संतांच्या क्षेत्रांमध्ये जाऊन त्या त्या संतांचे समाधी सोहळे संपन्न करण्याची परंपरा या फडातून सुरू झाली. यामध्ये आजही आळंदी, पैठण, तेर, त्र्यंबकेश्वर, आरण या संतक्षेत्री हे कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहेत. आज देहूकर महाराजांचा फड अनेक शाखांद्वारे कार्यकत आहे.