

डॉ. आनंद ज. कुलकर्णी
आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे हजारो फायदे दिसत आहेत, तसेच तोटेदेखील दिसत आहेत. त्यांची गुणात्मक तुलना करणे अतीव गरजेचे आहे. हे मात्र नक्की आहे, की एआयमधील संशोधन, नवनिर्माण व वापर यांपैकी काहीही थांबवता येणार नाहीये. पुढील काळात धोरणात्मक वर्चस्वासाठीदेखील त्याचा उपयोग होईल. त्यामुळे सद्सद्विवेकबुद्धीने एआयचा केवळ आवश्यक तेव्हाच वापर होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
जितकी मालाची किंवा सेवेची गरज, तितके उत्पादन जास्त, हे पुरवठा साखळीचे अगदी मूलभूत तत्त्व आहे. जगातील प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू या साखळीचा अविभाज्य घटक आहे. मोटार गाड्यांची गरज वाढू लागली, तशी विविध प्रकारच्या धातूंची गरज वाढली, त्यासाठी खाणींमधून अधिक उत्खनन होऊ लागले, तेलाचा उपसा अधिक होऊ लागला, काचेचे उत्पादन अधिक प्रमाणात होऊ लागले. बदलत्या जीवनशैलीमुळे फ्रीज, वॉशिंग मशिन, एअर कंडिशनर यांची गरज वाढत आहे; त्या प्रमाणात लागणारा कच्चा मालदेखील पुरवला जात आहे. त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा शोधदेखील लागत आहे. अशी हजारो उदाहरणे देता येतील. यामुळे औद्योगिकता वाढीस लागते, हातांना काम मिळते व रोजगार उपलब्ध होतो, जीवनमानही उंचावते. पण यासाठी विविध खनिजे, विविध प्रकारचे वायू व रसायने, पाणी, कोळसा अशी जी मूलभूत संसाधने लागतात, ती सर्व निसर्गातूनच मिळवावी लागतात.