सुरभि वालावलकर ठोसर
तलावांचं शहर अशी ठाणे शहराची ओळख. पूर्वी ६५हून अधिक तलाव असणाऱ्या ठाण्यात आज केवळ ४१ तलाव शिल्लक आहेत. तलावांचं सुशोभिकरण करताना तलावांचं संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर ‘एक होता तलाव’ असं म्हणावं लागायला वेळ लागणार नाही...
तलाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं नितळ निळंशार पाणी, काठावरची हिरवीगार वनराई, पाण्यात मनसोक्त बागडणारी कासवं, मासे, आकाशात विहार करणारे पक्षी... पण अलीकडच्या काळात खरंच हे सगळं डोळ्यांसमोर उभं राहतं का? की तलाव म्हटल्यावर आठवतं ते हिरवट राखाडी पाणी, सर्वत्र पसरलेलं कचऱ्याचं साम्राज्य आणि पाण्यावर पसरलेली जलपर्णी? प्रत्येकाची तलावाची संकल्पना वेगळी असते. जसे तलाव आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात बघतो तसेच ते आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात.