

Sahyadri Basalt Legacy
esakal
आपला खडक, त्यातून घडलेला सह्याद्री यांनी आपल्यावर किती प्रभाव टाकला आहे. त्यातून आपला महाराष्ट्र तर घडला आहेच, पण इथल्या नद्या-डोंगर-दऱ्या-माती, आजूबाजूचा भवताल यामुळे आपलीही जडणघडण होत असते. त्यामुळे आपल्यावर, आपल्या जगण्यावर त्याचाच प्रभाव आहे असे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती होणार नाही.
हा प्रश्न विचारला तर कितीतरी उत्तरे येतील. इथला निसर्ग, गिरिशिखरे, जंगले, नद्या, इतिहास-शौर्य, माती-दगड, प्राणी-वनस्पतींच्या अनुषंगाने जैवविविधता, इथला माणूस... हे सारे खरेही आहे. पण भूतकाळात सर्वांत मागे जाऊन पाहिले, तर महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजे इथला काळा कातळ आणि त्यातून निर्माण झालेला सह्याद्री पर्वत. असे म्हणण्यामागे अनेक कारणे आहेत, कारण याच खडकाने आणि सह्याद्रीने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आकार दिला आहे, घडवलेही आहे. म्हणूनच त्याच्याशिवाय महाराष्ट्राची कल्पना करताच येणार नाही.
पण असे काय आहे या खडकात आणि सह्याद्रीत? हा मनात येणारा पुढचा प्रश्न. याचे उत्तर शोधतानाच त्याची ओळख होते आणि आपल्या कितीतरी शंकांचेही निरसन होते. या आपल्या खडकाने आणि त्यात घडलेल्या सह्याद्रीने आपला भूगोल, इतिहास, माती-शेती, जलस्रोत, प्राचीन संस्कृती-कला अशा कितीतरी गोष्टी प्रभावित केल्या आहेत. इतकेच नव्हे तर आधुनिक काळातील काही गंभीर प्रश्नांवरचे उत्तर होण्याचीही या घटकांची क्षमता आहे.