Nagpur chipko movement
Esakal
Premium|Amrapali Tree: नागपूरच्या काँक्रीटच्या जंगलात आम्रपाली आंब्याचा शेवटचा वृक्ष वाचवण्यासाठी चिपको आंदोलन
प्रज्ञा जांभेकर
आता हायपरलूप स्टेशनचा पायाभरणी समारंभ आम्रपालीच्या छायेत होणार होता. हजारोंच्या संख्येनं लोक झाडाभोवती जमले होते. पायाभरणी समारंभात तारा आणि रवी शेजारी शेजारीच उभे होते. पायाभरणी झाल्यावर प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. बांधकाम सुरू झालं. एवढंच नव्हे, तर नव्या योजनेनुसार आणखी आम्रपाली वृक्षांची लागवड करायचं ठरलं होतं, त्यानुसार वृक्षलागवडही करण्यात आली.
एकविसावं शतक जवळपास संपत आलं होतं. नागपूरचं रूपांतर आता स्टील आणि काचेच्या एका विस्तीर्ण जंगलात झालं होतं आणि हे होऊनही जमाना झाला होता. अनेक इमारतींमध्ये दिवसाढवळ्या कृत्रिम प्रकाशाचा वापर बेसुमारपणे वाढला होता. दूरवर क्षितिजापर्यंत नजर जाईल तिथं काँक्रीटचं जंगल दिसत होतं. मनुष्यप्राणी खूप आधीच नैसर्गिक जगापासून दुरावला होता. नागपूरच्या त्या काँक्रीटच्या जंगलात ‘आम्रपाली’ या आंब्याच्या जातीचा एकच शेवटचा वृक्ष अजूनही हयात होता. बाकीची झाडं तोडली तरी गेली होती किंवा प्रदूषणामुळे मरून गेली होती.
जानेवारी महिन्यातला तो दिवस. सूर्य मावळतीकडे झुकला होता. आम्रपाली वृक्षावर सोनेरी रंगाची बरसात सुरू झाली होती. केशरी रंग नभांच्या निळाईवर पसरत चाललेला असतानाच एक बुलडोझर तिथं आणण्यात आला. सेरेंगटी नेचर क्लबचे कार्यकर्ते हा शेवटचा वृक्ष वाचवण्यासाठी जिवाचं रान करत होते. ते झाडाला चिकटून ‘चिपको’ आंदोलन करत होते. त्या आंदोलनाचं नेतृत्व एक तरुणी करत होती. शेवटचं झाड वाचवण्यासाठी सुरू असलेलं हे आंदोलन एक तरुण लांबून बघत होता. तो आश्चर्यचकित झाला. त्यानं होलो स्क्रीनवर चिपको आंदोलनाची माहिती बघितली - १९७०मध्ये तत्कालीन उत्तर प्रदेशात सुरू झालेल्या या पर्यावरणवादी चळवळीचा मुख्य उद्देश जंगलतोड थांबवणं आणि जंगलांचं संरक्षण करणं हा होता. झाडांना मिठी मारून ती कापू न देणं हा मार्ग या चळवळीनं अमलात आणला.
देशभरातल्या पर्यावरणप्रेमी संघटना त्या काळी या अहिंसक चळवळीत सहभागी झाल्या. वृक्षतोड थांबवण्याबरोबरच वृक्षलागवड करणं आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं कामही या आंदोलनानं केलं. नागपुरातही चळवळ पोहोचली होती. त्यानंतर एका वर्षातच १९७१मध्ये आम्रपाली आंब्याचं वाण दिल्लीतल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेत डॉ. पिजुष कांती मजुमदार यांनी विकसित केलं. ‘दशेरी’ आणि ‘नीलम’ यांच्या संकरातून ही जात तयार झाली होती. पश्चिम बंगालमध्ये नादिया जिल्ह्यातल्या चकदाहा इथं मजुमदार यांच्या मदतीनं हा आंबा प्रथम लावण्यात आला. नियमित फळं देणारी जात असल्यामुळे ही जात लोकप्रिय झाली. नंतर काही वर्षांतच नागपुरात आम्रपाली आंब्यांची लागवड करण्यात आली. त्यातलाच हा शेवटचा आम्रपाली वृक्ष! काही सेकंदांत मिळालेली माहिती वाचून त्या तरुणाची उत्सुकता ताणली गेली.
