

Female home buyers in Maharashtra
esakal
राज्यसरकारच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्यावतीने गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या रुक्ष आकडेवारीपेक्षा एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे, तो म्हणजे राज्यात महिलांच्या नावाने घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. संपूर्ण राज्यभरात मागच्या वर्षात ७५ हजार महिलांच्या नावावर घर खरेदी केली गेली. राज्यसरकारने महिलांच्या नावावर घर खरेदी करणाऱ्यास एक टक्का सवलत दिली होती. वास्तू किंवा अन्य मोठ्या खरेदीत महिलांचे नाव लावणे टाळले जाते, या सर्व पार्श्वभूमीवर महिलांच्या नावाने घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली, हा खरोखरच स्त्री सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. या पूर्वी लोकचळवळीमध्ये असा प्रयत्न शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केला होता. महिलांना सन्मान मिळावा यासाठी त्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व शेतकऱ्यांना तुमच्या जमिनीच्या मालकीमध्ये तुमच्या पत्नीचे नाव आवर्जून लावून घ्या, असे सांगितले होते. त्यांच्या आवाहनामुळे त्याकाळी हजारो शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीला आपल्या पत्नीचे नाव लावले, ही खरोखरच अभिमानाची आणि सामाजिक बदलाची सुरुवात होती. त्यानंतर मुद्रांक शुल्कातील सवलतीच्या निमित्ताने राज्यसरकारच्या पुढाकाराने महिलांच्या नावाने घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली, हे कौतुकास्पद आहे.