

Palash Tree
esakal
डॉ. मंदार दातार
वनस्पतींवर कविता कशाला लिहायला हव्यात? वनस्पती स्वतःच तर कविता असतात. त्यांच्याच पानोपानी, पाकळ्यांवर नानाविध रंगांनी लिहिल्या गेलेल्या, गंधांनी हवेवर छापल्या गेलेल्या ‘अबोलीचे बोल’ असणाऱ्या कविता. लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीच्या चक्रातून जातजात जगण्याच्या एका कोणत्या तरी नेमक्या ‘मीटर’मध्ये, नेमक्या वृत्तात चपखल बसलेल्या या सजीव कविता. मात्र आपल्याला जरी निसर्गात सगळे काही ‘जें जें उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर तें तें’ दिसत असले तरी ते तसे नसते. उत्क्रांतिशास्त्र म्हणते, की उत्क्रांतीचा उद्देश पूर्णत्व गाठणे नसून, त्या त्या स्थितीत उपलब्ध पर्यायांतून सर्वोत्तम निवड करणे हा असतो. निसर्ग प्रत्येक सजीवाला कधीच सर्वगुणसंपन्न करीत नाही, तर केवळ जगण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी ‘सक्षम’ करतो. केवळ सक्षम? सर्वगुणसंपन्न नाही? काही झाडांकडे पाहून तुम्हाला हे पटेल का हो? विशेषतः पूर्ण बहरातला पळस ज्यांनी पाहिला आहे त्यांना तरी?