

World Happiness Index India Ranking
esakal
विश्वजीत राळे
मानवाच्या प्रगतीसाठी मानवी विकास निर्देशांक आणि आनंद निर्देशांक हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टमधलं भारताचं स्थान हे निश्चितच चिंताजनक आहे! सरकारनं केवळ योजनांची घोषणा न करता खरंच जनतेचा विकास कसा होईल, नागरिक आनंदी कसे राहतील, यावर भर देणं गरजेचं आहे, हेच या अहवालातून वारंवार अधोरेखित होत आहे.
आपण बरेचदा पाहतो, की विकास आणि पैशांच्या मागं धावत सुटलेला माणूस जगायचं विसरून जातो. मग प्रश्न पडतो, की जगायचं कशासाठी? आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं निरनिराळं असतं. पण एक मात्र तितकंच खरं आहे, की सुखानं, समाधानानं, आनंदानं जगण्याची माणसाची आस मात्र आजही कायम आहे. तुकाराम म्हणतात - ‘तुका म्हणे समाधान, हेचि खरे धन!’ पैसा, संपत्ती ही तिथपर्यंत पोहोचण्याची माध्यमं आपण म्हणू शकतो. अगदी अश्मयुगातील माणसापासून ते आजच्या आधुनिक मानवापर्यंत सुख-समाधानाचा, आनंदाचा शोध घेण्याचे माणसाचे प्रयत्न आजही दिसून येतात आणि त्यासाठी त्याची धडपड सुरूच असते! सुख कशाला म्हणावं, समाधान कशात मानावं आणि आनंदाचा शोध कसा घ्यावा, हेच मुळात आपलं ठरलेलं नाही. स्वतःचा आनंद नेमका कशात आहे, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सतत सुरू असताना, संयुक्त राष्ट्रांनी मात्र आनंदी देश कोणता हे शोधण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं आणि गेल्या १४ वर्षांपासून ते शिवधनुष्य पेलतही आहे!