डॉ. केशव सखाराम देशमुख
प्राणी, पक्षी, कीटक अथवा सरपटणारे जीवविश्व मारुती चितमपल्ली अशा ढंगात पेश करतात, की वाचणारा गुंतून आणि गुंगून जाणारच. हा लेखक प्राण ओतून, देह झिजवत हिंडला. या साऱ्या साधनेचं फलित म्हणजे मारुतीरावांचं लेखन आहे. एकदा हे कळलं, की मग लेखकाची तपवृत्ती कळते. मगच त्याच्या लेखणीची विलक्षण महत्ता कळून येते!
‘नित्य सृष्टीसौंदर्य, आकाशाचं दर्शन आणि पक्षी निरीक्षण यांमुळं माझं अंतःकरण इतकं ज्ञानमय झालं की शांती आणि सौंदर्य यांनी मला भारून टाकलं’... अरण्याला आपल्या रक्तात इतकं रसरसून एकरूप करून मारुती चितमपल्ली उभा जन्म जगले!
अरण्याविषयी अपूर्व आत्मीयता, अवघी वनराई म्हणजे तपश्चर्या, अफाट वाचन, समग्र जीवनसृष्टीचाच लळा आणि देहाचीच भिंगरी करून विधायक केलेली भ्रमंती ही अशी आगळीच वैशिष्ट्यं चितमपल्ली यांच्या ठायी होती. त्यामुळे, त्यांचं लेखन फक्त सुख देत नाही, तर कोणाही वाचकास अरण्याची जणू सफरच घडवून आणतं.