अतुल देऊळगावकर
पृथ्वीवर २०२०पासून उष्णतेचा बॉम्बहल्ला सुरू झाला आहे, असं हवामान शास्त्रज्ञांचं निदान आहे. यामुळे होणाऱ्या भयावह परिणामांचा अभ्यास वैज्ञानिक करत आहेत. अशा काळात आपलं संरक्षण करणं हाच आपला प्राथमिक हेतू असायला हवा.
गेल्या दहा-बारा वर्षांत भारताला व जगाला, एकानंतर एक व आधीपेक्षा अधिक तीव्र आपत्तींना सामोरं जावं लागत आहे. मागील वर्षात अतिवृष्टी, ढगफुटी, बर्फवृष्टी, अरण्य वणवे, अवर्षण, दुष्काळ, उष्णतेची लाट वा भूस्खलनाच्या यातनांनी जगाला हैराण केलं आहे.
दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्न्मेंट (सीएसई) या संस्थेनं वर्ष संपताच भारतातील हवामान आपत्तींचं कॅलेंडर तयार केलं. त्यानुसार २०२२मधील ३७५ दिवसांपैकी ३१४ दिवस कोणती ना कोणती आपत्ती आली होती. २०२३मध्ये ३६५ दिवसांपैकी ३१८ दिवस बदलत्या हवामानाचे परिणाम दिसले होते.
तर २०२४मध्ये ३६६ दिवसांपैकी ३२२ दिवस देशाला हवामान आपत्ती सहन कराव्या लागल्या. त्यात हजारो लोकांचे आणि जनावरांचे बळी, लाखो हेक्टर जमिनीवरील पिकांची नासाडी, कोट्यवधी रुपयांची हानी झाली. अनेकांना स्थलांतर करावं लागलं. तरीही आजही अनेकांना हवामान बदल ही समस्या वर्तमानातील न वाटता भविष्यात कधीतरी येणारी समस्या वाटते.