

Wai Tourism
esakal
रेवती सप्रे
संध्याकाळ असल्यामुळे मावळतीच्या सूर्यकिरणांनी कृष्णा नदीचे पात्र सोन्यासारखे झळाळून निघाले होते. आजूबाजूला चारही दिशांना असलेले डोंगर, थंडगार वारा आणि मधोमध संथ वाहणारी कृष्णामाई... नकळत हात जोडले गेले. कृष्णामाईच्या दर्शनाने व थंडगार स्पर्शाने मन सुखावले.
मुंबईच्या धावपळीच्या आणि चाकोरीबद्ध जीवनातून निवांतपणा मिळावा अणि निसर्गाच्या सान्निध्यात दोन-चार दिवस घालवावेत, असे मला आणि माझ्या पतीला वाटत होते. त्यामुळे यावर्षीच्या मार्चमध्ये अचानक मिस्टरांच्या मित्रमंडळींनी साताऱ्यातील वाई येथे सहलीला एकत्र जाण्याचा बेत आखला. मित्रमंडळी बरेच महिन्यांनी भेटणार होती, म्हणून मिस्टरही लगेच तयार झाले. मलाही वाई गाव बघण्याची उत्सुकता होतीच. मग सगळे नियोजन करून आम्ही वाईला गेलो.
वाईपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये आम्ही सर्व राहणार होतो. कारने वाई ते ठाणे अंतर किमान सहा-सात तासांचे आहे. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून आम्ही आदल्या दिवशी निघून त्या रात्री मिस्टरांच्या मित्राच्या घरी, पुण्याला राहिलो. आम्ही एकूण आठ जोडपी होतो. सर्व मित्रमंडळी नाश्त्यासाठी पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये जमली. सकाळी नऊच्या सुमाराला आम्ही पुण्याहून निघालो.