डॉ. प्रणिता अशोक
शरीरासाठी स्निग्ध पदार्थ आणि तेलांचा वापर आवश्यक आहे. तेलांचा वापर पूर्णपणे बंद करणे अयोग्य आहे. बाजारात मिळणाऱ्या बटर, तूप आणि भरपूर तेलापासून तयार केलेले बाहेरचे पदार्थ खाणे टाळल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत होईल. स्निग्ध पदार्थ आणि तेलाची शुद्धता, त्यासाठी वापरण्यात येणारी प्रक्रिया समजून घ्यायला हवी.
डाएट म्हटले की उपाशी राहायचे, तेलकट-तुपकट खायचे नाही, दुधाचे पदार्थ टाळायचे, विशिष्ट भाज्याच, त्याही उकडून खायच्या असे अनेक समज-गैरसमज असतात. व्हाॅट्सअॅप विद्यापीठात तर आरोग्य, आहार, औषधे यांविषयी लिहिणारे, बोलणारे एवढे तज्ज्ञ झाले आहेत, की ते वाचून-ऐकून प्रत्येकजण चक्रावून जातो. कशावर विश्वास ठेवावा हेच समजत नाही. अशावेळी आपण माहिती देणाऱ्या व्यक्ती त्या क्षेत्रातील अनुभवी, तज्ज्ञ आहे का हे पाहिले पाहिजे.
शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा देणाऱ्या स्निग्ध पदार्थांबाबतही अशाच वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण स्निग्ध पदार्थ आणि तेले हा आपल्या आहाराचा एक आवश्यक भाग आहेत. त्यांमुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते, ऊर्जा मिळते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंवा अतिवापर टाळलाच पाहिजे. जर योग्य मापात स्निग्ध पदार्थ आणि तेलांचा वापर झाला, तर तो शरीरासाठी लाभदायक आणि आवश्यक असतो.
तेल प्रामुख्याने ट्रायग्लिसराइड्सपासून तयार होते, जे फॅटी अॅसिड्स व ग्लिसरॉल यांपासून तयार होतात. वेगवेगळ्या तेलांमध्ये ओमेगा-३, ओमेगा-६ फॅटी अॅसिड्स, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई, के, आणि काही बायोअॅक्टिव्ह संयुगे असतात.
तेल आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. पण आपण कोणते तेल वापरतो, किती प्रमाणात वापरतो आणि किती वेळा वापरतो यावर त्याचे शरीरावर होणार परिणाम अवलंबून असतात. काही नैसर्गिक तेलांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, व्हिटॅमिन ई, आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जी हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात, शरीरातल्या पेशींना संरक्षण देतात आणि मेंदूलासुद्धा पोषण देतात.
उदाहरणार्थ, ऑलिव्ह तेल हे मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट्सने भरलेले असते. ते हृदयासाठी चांगले मानले जाते. नारळाच्या तेलातील लॉरिक अॅसिडमध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तीळ आणि शेंगदाणा तेलामध्ये चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात. ते शरीरातील वाईट कोलेस्ट्राॅल कमी करू शकतात.