
साम-दाम-दंड अशा कोणत्याही रितीने आपण निवडणुका जिंकू, असा फाजील आत्मविश्वास सत्ताधाऱ्यांना येतो, तेव्हा लोकांचे प्रश्न बाजूला पडतात. पैसा, ताकद आणि दबाव यातून मी सत्ता मिळवू शकतो, ही प्रवृत्ती वाढते आहे. देश व राज्य प्रगतिपथावर असल्याचे खोटे चित्र रंगवले जात आहे. आम्ही सरकारच्या या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरू, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्ष आगामी काळात सरकारविरोधात आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले. २०२९ च्या निवडणुका हे आमचे लक्ष्य आहे, असा निर्धार त्यांनी ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी राजेश सोळसकर यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.