Sindhudurg Fort: A Testament to Maratha Naval Supremacy
Esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला संपूर्ण पश्चिम भारताच्या किनारपट्टीचे भूषण आहे. सिंधुदुर्ग किल्ला सिंधुसागरभूषण आहे. सागरी किनारा सुरक्षित ठेवण्यात त्याचे मोलाचे योगदान आहे. महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा तो साक्षीदार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आले, की डोंगरी किल्ले आणि भुईकोट जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच सागरी किल्लेही... आपले स्वराज्य सुरक्षित ठेवून ते वृद्धिंगत करायचे असेल तर सागरी सत्ता अत्यावश्यक आहे. इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि सिद्दी यांच्या जुलमी राजवटीतून प्रजेला मुक्त करायचे असेल तर त्यांना प्रतिकार करणारे आरमार गरजेचे आहे आणि त्यासाठी सागरी किल्ले महत्त्वाचे आहेत. अशी दूरदृष्टी असणारा मध्ययुगातील एकमेव राजा म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज. सिंधू नदी भारतात उगम पावते.
तिच्या खोऱ्यात चार हजार वर्षांपूर्वी जगातील पहिली अद्ययावत प्रगत नागरी संस्कृती विकसित झाली; परंतु तिच्या अंगा-खांद्यावर मोगल, सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, डच इत्यादी परकीय सत्ताधीश जुलमी राज्य करतात, याचे शल्य शिवाजी महाराजांना होते. त्याला पायबंद घालणे अत्यावश्यक होते. त्यासाठी सागरी सत्ता प्राप्त करणे महत्त्वाचे होते. परंतु, भारतीय समाजमनावर अनेक शतकांपासून ‘समुद्र उल्लंघन करणे पाप (अधर्म) आहे’ असे बिंबवण्यात आले होते. पाश्चात्त्य आक्रमक येऊन येथे थैमान घालत होते आणि भारतीयांना मात्र अंधश्रद्धेने जखडून ठेवले होते.