

Pratapgad Battle history
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
निवडक सामग्री घेऊन अफजलखानाचे ५-८ हजारांचे सैन्य वाईहून निघाले. कृष्णा नदीच्या डाव्या काठाने चिखली व तेथून तायघाटाची कष्टप्रद खडी चढण चढून ते महाबळेश्वराच्या पठारावर आले. पुन्हा रडतोंडीच्या तीव्र उताराच्या घाटाने ते जावळीत उतरले. शिवाजीराजांनी आपल्या माणसांना सांगून झाडेझुडूपे कापून त्यांच्यासाठी पुरेशा रुंदीचा रस्ता केला आणि त्यानिमित्ताने आपली माणसे संपूर्ण जावळीत पेरून ठेवली.
खानाचे जावळीत आगमन ः जावळीत आल्यावर वेळूच्या बेटांनी व्याप्त अशा कोयना नदीच्या काठावर पार ते जावळी गावापर्यंत खानाने छावणी उभारली. भोवतालच्या प्रमुख ठाण्यांवर खानाने आपल्या टेहळणीच्या व संदेशवहनाच्या चौक्याही उभारल्या. खानाचे गुप्तहेरांनी आजूबाजूच्या परिसराची व भेटीच्या जागेची कसून पाहणी केली. त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. या सर्व चौक्यांना चकवून राजांनी आपली माणसे ठिकठिकाणी नेमली. आपल्या सैन्यसंख्येची, सैन्य सामर्थ्याची थोडी सुद्धा कल्पना खानाला येऊ दिली नाही. उलट महाराज व त्यांचे सैन्य अतिशय घाबरट व कच्चे आहे, अशी समज खानाला झाली. त्यानंतर दोघांनीही परस्परांचे कुशल विचारण्याकरिता आपापले वकील एकमेकांकडे पाठविले. खानाला व सोबत आलेल्या सरदारांना शिष्टाचारास अनुसरून भेटी दिल्या पाहिजे म्हणून राजांनी खानाच्या छावणीतील व्यापाऱ्यांना बोलावून घेतले. आणि त्यांच्याकडील रत्ने व अन्य वस्तू आपल्याजवळ ठेवून घेतल्या. या सर्व प्रकारांमुळे खानाचा राजांवर विश्वास बसला.