

India North-South politics
esakal
सुनील चावके - ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांअखेर उत्तर किंवा उर्वरित भारत आणि दक्षिण भारतादरम्यानची सामाजिक-आर्थिक रेषा ठळक झाली आहे. पश्चिम बंगाल, आसाममधील एकूण ४१९ जागांपैकी भाजपने २८९ म्हणजे ६९ टक्के जागा जिंकल्या; पण तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या एकूण ४०४ जागांपैकी भाजप दोन टक्क्यांहूनही कमी म्हणजे फक्त आठच जागा जिंकू शकला. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आसाम आणि दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगाल अशी विभागणी करून भाजप सर्वशक्तीनिशी मैदानात उतरला होता हे लक्षात घेता दक्षिणेतील राज्यांमधील निवडणुका सामान्य वातावरणात झाल्याचे स्पष्ट होते.
आंध्र प्रदेश वगळता आज दक्षिणेतील पाचपैकी कर्नाटक, तेलंगण आणि केरळ या तीन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आणि तमिळनाडूमध्ये प्रभाव आहे. गेल्या चार वर्षांमध्ये बसप, भारत राष्ट्रसमिती, ‘वायएसआर’ काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि माकप-भाकपसारख्या प्रादेशिक पक्षांची अस्तित्व संपण्याच्या दिशेने वाटचाल झाली आहे. परिणामी, राष्ट्रीय राजकारण प्रामुख्याने भाजपविरुद्ध काँग्रेस अशा उत्तर-दक्षिण ध्रुवांदरम्यानच्या संघर्षावर केंद्रित होणार आहे. तमिळनाडूची लागण झाल्यास आणि राहुल गांधी यांना पूर्वीची सारी कटुता विसरून काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले जगनमोहन रेड्डी यांच्याशी हातमिळवणी केल्यास २०२९मध्ये आंध्र प्रदेश काबीज करायलाही फारसा वेळ लागणार नाही. पण त्यासाठी २०२९ पर्यंत सुपरस्टार जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमीळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या सरकारला टिकून राहावे लागेल.